पाकिस्तानची दाणादाण, भारतापुढे २४२ धावांचे आव्हान

  44

दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारताविरुद्धच्या साखळी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पण त्यांना ५० षटके खेळणे जमले नाही. पाकिस्तानचा डाव ४९.४ षटकांत आटोपला. कुलदीप यादव, हार्दिक पांड्या, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा डाव २४१ धावांत आटोपला. आता भारतापुढे ५० षटकांत २४२ धावा करण्याचे आव्हान आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास साखळीतील सलग दोन सामने जिंकत भारत उपांत्य फेरीत प्रवेश करू शकले.



प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानचे सलामीचे दोन फलंदाज ५० धावा होण्याआधीच परतले. पाकिस्तानचा अर्धा संघ १६५ धावांवर बाद झाला होता. यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव आणखी वाढवला आणि पाकिस्तान २५० धावांचा टप्पा गाठू शकणार नाही याची खबरदारी घेतली.

सलामीला आलेला बाबर आझम २३ धावा केल्यानंतर हार्दिक पांड्याच्या चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुलकडे झेल देऊन परतला. पाठोपाठ इमाम उल हक १० धावा करुन धावचीत झाला. अक्षर पटेलने त्याला धावचीत केले. कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान ४६ धावा केल्यानंतर अक्षर पटेलच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सौद शकील ६२ धावा करुन हार्दिक पांड्याच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देऊन परतला. तय्यब ताहिर चार धावा करुन रविंद्र जडेजाच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. सलमान आघा १९ धावा करुन कुलदीप यादवच्या चेंडूवर रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. शाहीन आफ्रिदी शून्य धावांवर कुलदीप यादवच्या चेंडूवर पायचीत झाला. नसीम शाह १४ धावा केल्यानंतर कुलदीप यादवच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देत तंबूत परतला. हारिस रौफ आठ धावा केल्यावर धावचीत झाला. त्याला अक्षर पटेलने यष्टीरक्षक केएल राहुलच्या मदतीने बाद केले. खुशदिल शाह ३८ धावा करुन हर्षित राणाच्या चेंडूवर विराट कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. अबरार अहमद शून्य धावा करुन नाबाद राहिला.

भारताकडून कुलदीप यादवने तीन, हार्दिक पांड्याने दोन तर हर्षित राणा, अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी घेतला. भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना सहा गडी राखून जिंकला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाकिस्तानने गमावला आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा ६० धावांनी विजय झाला होता. यामुळे अ गटात न्यूझीलंड पहिल्या आणि भारत दुसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश तिसऱ्या आणि पाकिस्तान तळाच्या अर्थात चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना जिंकल्यास सलग दुसरा विजय मिळवत भारत थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. यामुळे भारत – पाकिस्तान सामन्यात काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.
Comments
Add Comment

पहिल्या कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, प्रमुख गोलंदाज टंग दुखापतग्रस्त

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून सुरुवात होतेय. पहिल्या कसोटीपूर्वी

WTC Final : ट्रॅव्हिस हेडचा व्हेरेन बोल्डने घेतलेला थरारक झेल, कॅचचा Viral Video

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवार ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद

WTC Final सुरू होण्याआधीच MCC ला ४५ कोटी रुपयांचे नुकसान

लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच न्यूयॉर्क मेजर लीगमध्ये झाला कॅप्टन

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने

रोहित शर्माच्या वनडे कर्णधारपदाला धोका?

मुंबई: रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो केवळ वनडे क्रिकेट खेळताना त्याच्या

Rahul Dravid On Bangaluru Stampade: बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर राहुल द्रविडची पहिली प्रतिक्रिया समोर, आरसीबीबद्दल केलं वक्तव्य

बंगळुरू: आयपीएल २०२५चे विजेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स  बंगळुरूच्या विजय परेडदरम्यान झालेल्या