म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपासून होणार कार्यान्वित
मुंबई : म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून एप्रिलपासून हा कक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत.
म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे चार ते पाच हजार नागरिक या कार्यालयाला भेट देतात.
एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे डिसेंबरपासून म्हाडा मुख्यालयातील गेट क्रमांक ४ येथे या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. नागरी सुविधा केंद्राचे काम मार्चच्या अखेरीस पूर्ण होऊन एप्रिलपासून हा कक्ष सुरु होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल येथे या केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला पाठवण्यात येईल. त्या अर्जाचा पाठपुरावा देखील नागरिकांना याच केंद्रावर घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे.