राज्य शासनाच्या वतीने किल्ले संवर्धनाचे काम सातत्याने सुरू

  27

शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित किल्ले हे आमच्याकरीता मंदिरापेक्षाही मोठे असून त्यांचे जतन आणि संवर्धनाचे काम राज्य शासनाच्या वतीने सातत्याने सुरू आहेत, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी व्यक्त केले. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार उपस्थित होते.


फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे असण्यासोबतच उत्तम प्रशासक होते. विविध व्यवस्थापनाचे गुरू होते, शिवरायांनी आपले संपूर्ण आयुष्य जनतेच्या कामी लावले म्हणून आदर्श राजा, जाणता राजा, श्रीमंत योगी म्हणून आपण त्यांचे स्मरण करतो. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे विविध विकास कामे सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरीचाही विकास करण्यात येत आहे. छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील बारा गड किल्ले नामांकनासाठी निवडले आहेत.


हे गडकिल्ले स्थापत्यशास्त्र, जलसंवर्धन, पर्यावरणशास्त्राचा उत्तम नमुना असून याबाबत पॅरिस येथील होणाऱ्या महासभेत येत्या आठवड्यात सादरीकरण करण्यात येणार आहे. हे गड किल्ले जागतिक वारसास्थळे होतील आणि जगातील लोक ते बघण्याकरीता येतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. मुगल साम्राज्यात विविध राजे, राजवाडे मांडलिकत्व पत्करत असताना मराठी मुलखात अनाचार, अत्याचार सुरू होते. माँ जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना याविरुद्ध प्रतिकार करून स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी दिली. छत्रपती महाराजांनी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र करून मावळ्यांची फौज तयार केली; या माध्यमातून देव, देश आणि धर्माची लढाई सुरू करून स्वराज्य स्थापनेतून भारताचा आत्मभिमान जागृत केला.


आजच्या १४० कोटी लोकसंख्येच्या आत्मभिमानी भारताच्या मागे छत्रपती शिवरायांची प्रेरणा असून ते आमचे आराध्य दैवत आहेत. येत्या ५ वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ४०० वा शिवजन्मोत्सव साजरा करणार आहोत. राज्यशासनामार्फत शिवनेरी परिसरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यरत राहू असेही त्यांनी यावेळी सांगितले. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘सर्वसमावेशक कारभार’ डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यात येत असून त्यांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. लोकल्याणकारी राज्य निर्मितीकरीता यापुढेही प्रयत्न करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्यांच्या मावळय़ांच्या पराक्रमाचे साक्षीदार असून त्यांनी यामध्ये प्राण फुंकले आहे. हे गड किल्ले अभियांत्रिकी, स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. याठिकाणी आल्यावर आपल्याला एक वेगळ्याप्रकारची ऊर्जा, प्रेरणा मिळते. म्हणून या गड किल्ल्याची देश विदेशातही लोकप्रियता आहे. त्यामुळे गड किल्ले, जुन्या मंदिरांचे जतन आणि संवर्धनाची कामे करण्यात येत आहे. गड किल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन एक सर्किट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट, किल्ले खऱ्या अर्थाने त्यांची दौलत आहे, ते आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान असून त्यांचे जतन, संवर्धन करणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे.


त्यामुळे राज्यशासनाच्या वतीने किल्ले शिवनेरी, रायगड, प्रतापगड, सिंहगड, पुरंदर आदी किल्ले परिसरात विविध विकासकामे करीत आहेत, किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडून देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित प्रसंग, त्यांनी घेतलेले प्रत्येक निर्णय स्वराज्याचे हित, जनतेचे कल्याण डोळ्यांसमोर ठेऊन दूरदृष्टीने निर्णय घेतला होता. सामाजिक एकोपा, न्याय, सुशासन आणि लोकल्याणाची शिकवण दिली. त्यामुळे आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांच्या विचारावर निष्ठा ठेवून काम करण्याचा संकल्प करूया, महाराष्ट्राला आणखी महान राष्ट्र करण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करूया, शिवरायांच्या विचारांचा वसा पुढे नेताना महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, हीच खरी शिवजयंतीची प्रचिती ठरेल.

Comments
Add Comment

सात तोळे सोन्याचे चोरी झालेले दागिने पोलिसांकडून परत

नेवासा : तालुक्यातील सौदाळा येथे तीन ठिकाणी चोरी करण्यात आली होती. यावेळी दोन अनोळखी व्यक्तींनी तीन लाख ३९ हजार

‘गणरचनेचा बिगुल’: जि. प. निवडणुकांच्या रणशिंगाला सुरुवात

प्रभागांची आखणी सुरू : राजकीय पक्ष मैदानात उतरले ! अ.नगर : ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद आणि

Maruti Chittampalli Passes Away: जंगल प्रत्यक्ष जगलेला माणूस काळाच्या पडद्याआड

अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचं 93 व्या वर्षी निधन अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळामुळे निधन

नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटी सोन्याचा मुकुट अर्पण

पुणे: आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात नांदेड येथील भक्ताकडून एक कोटी रुपयांचा सोन्याचा

एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे

Solapur Water Park Accident: पुन्हा एक अपघात! अकलूज सयाजीराजे वॉटर पार्कमधील भीषण दुर्घटना, एकाचा मृत्यू तर इतर जखमी

सोलापूर: अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या पार्कमधील एक