मुंबई : महाराष्ट्रावर (Maharashtra) जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम (Guillain–Barré syndrome or GBS) या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यात आतापर्यंत जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम या आजारामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी आठ मृत्यू पुणे जिल्ह्यात आणि एक मृत्यू मुंबईत झाला आहे. राज्यात जीबीएसचे आतापर्यंत २०५ रुग्ण आढळले आहेत. डॉक्टरांनी राज्यात आढळलेल्या सर्व जीबीएसबाधीत रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत.
धारावीतील ५० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण; अपात्र झोपडीधारकांचे काय होणार?
जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना पाणी पिण्याआधी अथवा खाण्यापिण्याचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्याआधी उकळून थंड करुन आणि गाळून घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. वैयक्तिक स्वच्छतेला प्राधान्य द्या. परिसर स्वच्छ राखा. उघड्यावरचे खाणेपिणे टाळा. शुद्ध पाणी प्या, ताजे सकस आणि वातावरणाला अनुकूल असे पदार्थ खा. तब्येत बिघडल्यास वैद्यकीय सल्ल्याने उपचार करा, परस्पर औषधोपचार करुन घेणे टाळा; असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला ‘जीबीएस’ चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे :
* अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
* अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा
* जास्त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप
नागरिकांनी घ्यावयाची काळजी :
* पिण्याचे पाणी उकळून प्यावे
* स्वच्छ व ताजे अन्न खावे
* शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये
* वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
* हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.