मुंबई : गणेशोत्सव हा सर्वांच्या जवळचा विषय आहे. १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणपती उत्सव आजही कायम आहे. दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने बाप्पाची वाट बघत असतात. बाप्पाला घरी घेऊन येण्यापासून ते विसर्जनापर्यंत भक्तांचा उत्साह कायम असतो. मात्र यावर्षी मुंबईतील काही भागात माघी गणेशोत्सवाला स्थापन करण्यात आलेल्या गणेश मूर्तींचा विसर्जन सोहळ्याला महानगरपालिकेने विरोध केला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज ११व्या दिवशी या मूर्तींचे विसर्जन करण्याचे निर्देश मंडळांना मिळाले आहेत.
कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपचा राजा गणेश जयंतीला (दि १ फेब्रुवारी ) मंडळात स्थापित झाला. या मूर्तीची हुबेहूब प्रतिमा लालबागच्या राजासारखी आहे. येथे दर्शनासाठी भाविक फार दुरून येतात. ही मूर्ती पीओपीची असल्या कारणाने मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचं विसर्जन करण्यास मनाई केली होती. मार्वे समुद्रावर पोलिसांनी मंडळाला अडवून या मूर्तीला परत घेऊन जाण्यास सांगितलं. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते.
महानगरपालिकेच्या या निर्णयावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि भाविकांमध्ये भडका उडाला. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान आता महानगरपालिकेने यावर तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले आहे.