Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखRahul Solapurkar Article : माफी मागितल्याने पापक्षालन होणार आहे काय?

Rahul Solapurkar Article : माफी मागितल्याने पापक्षालन होणार आहे काय?

एकवेळ हाणामारीत शरीरावर उमटलेले वळ काही काळाने भरून निघतात, झालेल्या घटनांचे काळाच्या ओघात विस्मरणही होते. पण कटू, अपमानास्पद शब्दांनी निर्माण झालेल्या जखमा कधीही विसरता येत नाहीत. त्याची आठवण विसरणेही शक्य नसते. चर्चेत राहण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करणे आणि समाजामध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर, जनआंदोलने झाल्यावर दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घेणे, माफी मागणे हा अलीकडच्या काळात एकप्रकारचा पायंडाच पडला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील एक अभिनयसंपन्न कलावंत राहुल सोलापूरकर यांनी अशाच स्वरूपाचे वक्तव्य करून माती खाण्याचा प्रकार केला आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यावरून सुटकेबाबत वक्तव्य करून काही काळ स्वत:वर प्रसिद्धीचा प्रकाशझोत वळविला. महाराजांची आग्र्याहून सुटका हा हिंदवी स्वराज्यातील महत्त्वाचा अध्याय होता. आग्रा भेट ही महाराजांच्या जीवावर बेतणारी होती. महाराजांसोबत हिंदवी स्वराज्यही संपुष्ठात येते की काय, इतपत भयावह वातावरण निर्माण झाले होते. महाराज दिल्ली पातशाहीचे बादशहा औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. ज्या औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना, भावांना सोडले नाही, तो औरंगजेब मुघली सलतनीला आव्हान देऊन स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवछत्रपतींना संपविल्याशिवाय समाधान थोडीच मानणार होता.

अशा वेळी महाराज नजरकैदेत असताना मराठा शक्तीने बलाढ्य मुघल साम्राज्याचा पाडाव करणे शक्यच नसते. मराठा साम्राज्याचे सैनिकदेखील मूठभर होते. मूठभर सैनिकांच्या बळावर मुघलावर अतिक्रमण करायचे की स्वराज्याची राखण करायची, हाही प्रश्न होता. अशा वेळी महाराजांनी युक्तीने काम चालवत आजारी पडणे, साधुसंतांना मिठाईचे पेटारे पाठविणे असे उद्योग करत पहाऱ्यात ढिलाई पडल्यावर युवराज संभाजी महाराजांसह शिवाजी महाराजांनी त्या नजरकैदेतून आपली सुटका करून घेतली होती. हा इतिहास जगजाहीर असताना मराठी चित्रपटसृष्टीतील टकलू हैवानफेम या नावाने ओळखले जाणारे कलाकार राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या सरदारांना व सैन्याला लाच देऊन तेथून निघाले, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते; परंतु पेटारे-बिटारे असे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून महाराष्ट्रात आले होते, असे वक्तव्य अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी केले होते. या वक्तव्याने भले काही काळ राहुल सोलापूरकर यांना प्रसिद्धी मिळाली, पण ही प्रसिद्धी नकारात्मक स्वरूपाची होती. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रीय माणसाच्या मनामध्ये संतापाची लाट उसळणे स्वाभाविक होती. महाराष्ट्रात राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा ठिकठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे बुद्धिमत्तेच्या जोरावर आग्र्याहून बाहेर पडले. सोलापूरकरांच्या म्हणण्याप्रमाणे ते जर आले असते, तर त्यांना शंभुराजेंना दुसऱ्याकडे सोडून येण्याची गरज पडली नसती. इतिहास बदलणारे तुम्ही-आम्ही कोण? असा सवालही यासंदर्भात माजी मंत्री छगन भुजबळांनी उपस्थित केला होता. राहुल सोलापूरकर यांच्या पुतळ्याचेही ठिकठिकाणी दहन करण्यात आले. मोर्चे काढण्यात आले. वातावरण चिघळत असल्याचे पाहून तसेच वाढता लोकप्रक्षोभ पाहून राहुल सोलापूरकर यांना त्यांच्या वक्तव्याची उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. समाजात वाढता प्रक्षोभ व उद्रेकाची भावना पाहता याबाबत खुद्द राहुल सोलापूरकर यांनी व्हीडिओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली. दीड ते दोन महिन्यांपूर्वी मी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात, याबद्दल केलेले वक्तव्य होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. तसा विचारसुद्धा माझ्या मनात कधी येणार नाही. त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी ‘लाच’ हा शब्द वापरला, त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत राहुल सोलापूरकर यांनी हात जोडले. माफी मागून हा विषय संपणारा नाही. अशा प्रवृत्तींचा आता कायमस्वरूपी बंदोबस्त करणे आवश्यक आहे. मुळात अशा प्रकारांना कुठेतरी वेसन घालणे काळाची गरज आहे. महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकार नाही. असे प्रकार यापूर्वीही घडले आहेत व घडत आहे. या अपप्रवृत्ती वेळीच ठेचून न काढल्यास व अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्याला धडा न शिकविल्यास असे प्रकार नजीकच्या भविष्यातही घडतच राहणार.

राज्य सरकारने आता या प्रकरणी पुढाकार घेऊन अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्याला कठोरात कठोर शासन करण्याची तरतूद केली पाहिजे. वक्तव्ये करायची, प्रसिद्धी मिळवायची, काय पडसाद उमटतात, याची प्रतीक्षा करायची, वातावरण चिघळणार अथवा अंगलट येणार असे दिसल्यावर दिलगिरी व्यक्त करून मोकळे व्हायचे. यालाही आता आळा घातला पाहिजे. माफी मागून विषय संपत नाही. मुळात अशा प्रकारची वक्तव्य करण्याची गरजच काय भासते? महापुरुषांच्या कार्याबाबत चिरफाड करायचा तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे? तुम्हाला त्या काळात घडलेल्या घडामोडींवर भाष्य करण्याची गरजच काय असते? यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मांण होऊन समाजाची जी हानी होते, मानसिक स्वास्थ्य गमविण्याची वेळ येते, अशा प्रकारची जबाबदारी कोण स्वीकारणार? उचलली जीभ आणि लावली टाळूला हे प्रकार कधी थांबणार आहेत? मोर्चे, निदर्शने करून संताप व्यक्त न करता अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्यांची थोबाडे वेळीच रंगविण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे.

जे वक्तव्य करतील, त्यांना भरचौकात लाथांनी तुडविले पाहिजे. वेळ पडल्यास कायदा हातात घ्यावा लागला तरी चालेल. पण अशा प्रकारचा प्रसाद दिल्याशिवाय या अपप्रवृत्तींना धडा मिळणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये करण्याच्या उद्योगाला कायमचाच आळा बसेल. निदर्शने, आंदोलने यातून अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्यांना फरक पडत नाही. आपल्यातील संतापाची, उद्रेकाची झळ वक्तव्य करणाऱ्याच्या घरादारापर्यत पोहोचल्यावर अशी वक्तव्ये करणारे शतदा नाही तर हजार वेळा विचार करतील…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -