मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. मात्र, या ऐतिहासिक घटनेबाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) याने एका मुलाखतीत ‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले होते आणि त्यासाठी पुरावेही उपलब्ध असल्याचे’ म्हटले होते. या वादग्रस्त विधानामुळे शिवप्रेमी आणि राजकीय नेत्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून राहुल सोलापूरकरवर टीका करण्यात येत आहे.
CM Devendra Fadnvis : आईने मंगळसूत्र विकले, फडणवीस हळहळले, मुख्यमंत्र्यांनी मुलाचे पालकत्व स्वीकारले
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
‘शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले होते, पेटारे-बिटारे काहीच नव्हते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले. सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले. त्याची खुण व पुरावे देखील आहेत. परमानंदांकडे देखील परवानगी होती. मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो’, असे विधान केले.
दरम्यान, राहुल सोलापूरकरच्या विधानानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांनी इतिहास विकृत केल्याचा आरोप केला आहे. काहींनी त्यांना तात्काळ माफी मागण्याची मागणी केली आहे, तर काहींनी त्यांच्या विधानाचे पुरावे मागितले आहेत. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनीही राहुल सोलापूरकरला खडे बोल सुनावले आहेत.
सोलापूरकरांनी विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली
“ राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु “हैवान” असल्याचं सिद्ध केलं आहे. राहुल सोलापूरकरने विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वकर्तृत्वावर आग्र्यातून निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला आहे. जाणीवपूर्वक महाराजांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी मी सभागृहात मागणी करेन’ असे वक्तव्य अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
राहुल सोलापुरकर ह्याने आपण टकलु “हैवान” असल्याच सिद्ध केलंय.छ.शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेले वादग्रस्त विधान,आपल्या विकृत मानसिकतेतुन इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणुन कधीच खपवून घेतल्या जाणार नाही.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) February 3, 2025
कोण आहेत राहुल सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर सुप्रसिद्ध अभिनेता आहे. आजवर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांमधून अभिनेते म्हणून काम केले आहे. नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तीनही माध्यमांतून काम केले आहे. थरथराट, व्हेंटिलेटर, नशीबवान, बळीराजाचं राज्य येऊ दे, बालगंधर्व, राजमाता जिजाऊ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच २०१७ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदीपक ‘चित्रकर्मी’ पुरस्कार मिळाला आहे.