मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द झाला असला, तरी २८ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू करण्याचा किंवा मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सरकारने आतापर्यंत ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे त्या सर्व नोंदींच्या आधारे पात्र व्यक्तींना तातडीने कुणबी प्रमाणपत्रे वाटप करावीत, अशी आमची मुख्य मागणी आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास कठोर भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी २० ते २५ ऑगस्ट दरम्यान गोदापट्ट्यात गाव बैठका आयोजित केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत आंदोलन करण्याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात परवानगीसाठी अर्ज देण्यात आल्यामुळे या आंदोलनाचे लोण मुंबईपर्यंत पोहोचणार का, याबाबत चर्चा सुरू झाली असून पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटील यांच्या ५८ लाख नोंदींच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. राज्यात ५८ लाख नवीन नोंदी सापडल्या नसून हा १९८६ पासूनच्या जुन्या नोंदींचा एकत्रित आकडा असल्याचा दावा तायवाडे यांनी केला आहे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर केवळ ५९ हजार नवीन नोंदी सापडल्याचे सांगत, वारंवार ५८ लाखांचा आकडा समोर आणल्याने दोन्ही समाजांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.






