पुणे : काॅन्ट्रॅक्टर राजकारणातून पदाधिकारी झाल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होते. अर्थातच पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो. हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही. मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु काॅन्ट्रॅक्टर लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी नवीन राजकीय भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरष्णे (ता.बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात जाहीर केली. यावेळी उपस्थितांनी मात्र एकच टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाठींबा दिला. शिरष्णे (ता.बारामती) येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने दूध बल्क कुलरची उभारणी केली आहे. त्या कामी संस्थेचे प्रमुख संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला होता. या कुलरच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.
बारामतीसह राज्यात काॅन्ट्रॅक्टर राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधासभा निवडणूत प्रखरशाने जाणवले, असे सांगून पवार म्हणाले, ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्हायच आहे, त्यांनी काॅन्टॅक्टर क्षेत्रात यायचे नाही.