राज ठाकरेंची निवडणूक निकालावर शंका
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ईव्हीएम मशीनबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी यासंदर्भात भाष्य केले. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या अतिप्रचंड यशामागे ईव्हीएममधील फेरफार असल्याचा आरोप केला होता. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाशी जवळीक असलेल्या राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशिनच्या विश्वासर्हतेबद्दल शंका उपस्थित केली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांचा उल्लेख केला.
बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते, सातवेळा आमदार झालेत. ही आठवी टर्म होती, त्यांची. सातवेळेला ७० ते ८० हजारांच्या ते मताधिक्याने निवडून यायचे. ते यावेळी १० हजार मतांनी पराभूत झाले. उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला, त्यामुळे ते बोलत आहेत. मी काय बोलतो, अख्खा महाराष्ट्र बोलत आहे. सत्तेत असलेल्या अनेकांचा मला फोन आले, त्यांनाही शॉक बसलाय. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, गेल्यावेळी १०५ जागा होत्या. २०१४ ला १२२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. पण अजित पवार ४२ जागा, चार-पाच जागा येतील की नाही, असे वाटत असताना त्यांना ४२ जागा मिळाल्या. जे इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण करत आले त्यांना १० जागा मिळतात, ही न समजण्यापलीकडची गोष्ट आहे. लोकसभेला काँग्रेसचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार येतात निवडून. त्यांचे १५ आमदार निवडून आले. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले होते, त्यांचे १० आमदार येतात. लोकसभेला ज्या अजित पवार यांचा एक खासदार निवडून येतात त्यांचे ४२ आमदार चार महिन्यात निवडून आले. काय झालं, कसं झालं, हा संशोधनाचा विषय आहे. या मतदानावर जाऊ नका, लोकांनी आपल्याला मतदान केले आहे, ते फक्त आपल्यापर्यंत आलेले नाही, केलेले मतदान कुठेतरी गायब झाले. असे राज ठाकरे यांनी म्हटले. अशाप्रकारे निवडणुका लढवायच्या असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या.
Maternity Hospital : मुंबई मनपाच्या ३० प्रसूतिगृहांचे होणार सोशल ऑडिट
यावेळी राज ठाकरे मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघात १४०० लोकवस्ती असलेले गाव आहे. या गावातील लोक राजू पाटील यांनाच मतदान करतात. या १४०० लोकांच्या गावात राजू पाटलांना शून्य मते मिळाली. अख्ख्या गावातून एक मत नाही पडत, जिथून राजू पाटलांना १४०० मते पडायची सगळी, तिकडून एक मत नाही पडत. तिकडे मराठवाड्यातील एक पदाधिकारी आहे, तो नगरसेवक होता, त्याला त्याच्या भागातून ५५०० मते पडली होती. आता विधानसभेला तो उभा होता, त्याला या निवडणुकीत २५०० मते पडली. अनेक असे निर्णय आहेत महाराष्ट्रात ज्यावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही विश्वास नाही, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.