Saturday, May 16, 2026

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : कला, संस्कृती अन् खाद्यसंस्कृतीची ओळख पटवून देणारा 'माटी ९ पूर्वांचल महोत्सव' : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : भारतीय संस्कृती महान असून ही संस्कृती समृद्ध करण्यासाठी महाराष्ट्राने anj पूर्वांचलने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विविध प्रदेश, भाषा आणि परंपरांमध्ये एकात्मता निर्माण करून भारतीय संस्कृती अधिक समृद्ध करण्याचे कार्य ‘माटी ९ पूर्वांचल महोत्सवा’ सारख्या उपक्रमातून होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सांताक्रुझ येथे कलिना कॅम्पस येथे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय,'माटी - ए पब्लिक ट्रस्ट' व कलिना विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'माटी ९ पूर्वांचल महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

यावेळी या कार्यक्रमाला जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा,सांस्कृतिक मंत्री ॲड आशिष शेलार, खासदार जगदंबिका पाल,मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु रविंद्र कुलकर्णी,माटी महोत्सवाचे आयोजक आसिफ आझमी, मॉडर्न ग्रुप कंपनीचे ज्ञानप्रकाश सिंह उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईमध्ये मिनी पूर्वांचल वसले आहे.चार ते पाच पिढ्यांपासून पूर्वांचलातील लोक महाराष्ट्रात स्थायिक झाले असून त्यांनी पूर्वांचलच्या मातीतल्या संस्कृतीच्या आठवणी जपल्या आहेत.“एक भारत, श्रेष्ठ भारत” पाहायचा असेल तर मुंबईतील पूर्वांचल समाजाकडे पाहावे, पूर्वांचल आणि महाराष्ट्र यांचे ऐतिहासिक नाते आहे.प्रभू श्रीराम पंचवटीमध्ये वास्तव्यास होते. येणाऱ्या कुंभमेळ्यात पंचवटी बदललेली दिसेल, तसेच त्र्यंबकेश्वरही नव्या स्वरूपात पाहायला मिळेल. भारतीय ज्ञानपरंपरेत काशी-वाराणसीला सर्वांत मोठे स्थान आहे.अकराव्या-बाराव्या शतकात भक्तीमार्गाचा प्रसार झाला.अनेक आक्रमणांनंतरही भारतीय संस्कृती नष्ट झाली नाही, कारण ती जिवंत ठेवण्याचे काम संतांनी केले, महाराष्ट्र आणि पूर्वांचलातील संतांनी समाजाला भक्तीमार्गावर आणत संस्कृतीचे जतन केले आहे.देशातील बंडाच्या सुरुवातीच्या काळात पूर्वांचलाने मंगल पांडे यांसारखे क्रांतिकारक दिले, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वांचल मधे असलेले काशी ही भारताच्या संस्कृतीचे, अध्यात्माचे आणि ज्ञानपरंपरेचे सर्वात मोठे केंद्र असून गंगेच्या प्रवाहाइतकीच प्राचीन काशीची ज्ञानधारा आजही अखंडपणे वाहत आहे. भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत काशीला अद्वितीय स्थान आहे. काशी केवळ एक धार्मिक नगरी नसून ती भारतीय ज्ञान, संस्कृती आणि परंपरेचे जिवंत प्रतीक आहे.उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेले सांस्कृतिक आणि विकासात्मक कार्य देशाच्या परंपरेला नवी दिशा देणारे आहे. समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य केले असून अनेक संत, विचारवंत आणि समाजपुरुषांनी आपल्या कार्यातून संस्कृती जिवंत ठेवली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वांचल या प्रदेशाने आपली सांस्कृतिक ओळख अत्यंत अभिमानाने जतन केली असून, यात धोबिया, बिरहा, नौटंकी आणि चैतीसारख्या समृद्ध लोककलांचा समावेश आहे. येथील प्रसिद्ध बनारस आणि लखनऊ घराण्यांनी संगीत जगताला अमूल्य देणगी दिली आहे. कला आणि खाद्यसंस्कृतीच्या बाबतीतही पूर्वांचल आघाडीवर आहे.बाटी-चोखा, सत्तू पराठा, बनारसी पाश्यांसारखे स्वादिष्ट पदार्थ या प्रदेशाची एक वेगळी आणि दिमाखदार ओळख निर्माण करतात.

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, मुंबईकरांना पूर्वांचलच्या समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेचा जवळून अनुभव घेण्याची सुवर्णसंधी ‘माटी ९ पूर्वांचल महोत्सवा’च्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.दोन्ही प्रदेशातील संस्कृती आणि इतिहास याला खूप महत्त्व आहे.या महोत्सवातून महाराष्ट्र आणि पूर्वांचल यांचे संबंध अधिक दृढ होतील.पूर्वांचल हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून समृद्ध परंपरा, संस्कार आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण अशी जीवनशैली आहे.अयोध्या, काशी, प्रयागराज आणि गोरखपूर यांसारख्या ऐतिहासिक शहरांशी जोडलेल्या पूर्वांचल प्रदेशाला स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे लोकप्रिय संस्कृतीत ‘वीरांची भूमी’ म्हणून ओळख मिळाली आहे. या भूमीने देशाला अनेक समाजसुधारक, विचारवंत आणि राष्ट्रभक्त दिले आहेत.

प्राचीन काळापासून वैदिक, बौद्ध आणि मुस्लिम शिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र म्हणूनही पूर्वांचलची ओळख राहिली आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि अलाहाबाद विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थांनी आधुनिक भारताच्या घडणीत आणि बौद्धिक विकासात मोठे योगदान दिले असल्याचेही उपराज्यपाल श्री. सिन्हा यांनी नमूद केले.

महोत्सवाचे प्रमुख संयोजक आसिफ आजमी यांनी सांगितले की, या महोत्सवाने केवळ पूर्वांचलची संस्कृती सादर केली नाही, तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश यांच्यातील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे कार्यही केले. प्रसिद्ध लोकगायिका पद्मश्री मालिनी अवस्थी यांनी भोजपुरी आणि मराठी लोकगीते सादर केली, तर काशीच्या घाटांवरील जीवनावर आधारित कविता आणि कथा साहित्यिक यांनी सादर केल्या.

मान्यवरांच्या हस्ते पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे,आयएनएचएस अश्विनीच्या बालरोग विभागाचे विभागप्रमुख कमांडर डॉ. अशोक यादव,मुंबई नॉर्थ इंडियन असोसिएशनचे कार्याध्यक्ष श्री शारदा प्रसाद सिंह,ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट आणि ठाकूर समूह कंपन्यांचे अध्यक्ष श्री व्ही. के. सिंह,डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपचे सीएमडी श्री अजय हरिनाथ सिंह,प्रसिद्ध अभिनेते आणि मॉडेल कुशल टंडन,बून मेटल अँड अलॉयज कॉर्पोरेशनचे प्रमोटर पार्टनर श्री आर. जे. सिंह, लोकगायक आणि कला क्षेत्रातील मान्यवर डॉ. शैलेश श्रीवास्तव यांचा सत्कार करण्यात आला.

Comments
Add Comment