आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांचे स्नान
प्रयागराज : उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात उद्या, बुधवारी तिसरे अमृतस्नान (शाही) होणार आहे. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर (Mauni Amavasya) होणाऱ्या या स्नानासाठी कोट्यवधी लोक अपेक्षित असून त्यानुषंगाने प्रशासन सज्ज आहे.
कुंभमेळ्याचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर त्याला ज्योतिषशास्त्रीय आधार देखील आहे. कुंभमेळा दर १२ वर्षांनी एकदा येतो, जो भारतातील ४ प्राचीन शहरे, हरिद्वार, नाशिक, प्रयागराज आणि उज्जैन येथे आयोजित केला जातो. या संगमाच्या पवित्र पाण्यात पवित्र स्नान करण्याची आणि पूजा करण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. कुंभमेळ्यात स्नान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांमध्ये १२ वर्षे युद्ध झाले. या युद्धादरम्यान ज्या ठिकाणी मडक्यातून अमृताचे थेंब पडले त्या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या युद्धामुळे, दर १२ वर्षांनी एकदा कुंभ येतो. महाकुंभातील स्नानाला अमृत (शाही) स्नान म्हणून ओळखले जाते.
प्रयागराज येथे १३ जानेवारी २०२५ रोजी प्रारंभ झाला. तेव्हापासून आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारने सांगितले आहे. महा महाकुंभातील मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानापूर्वीच, एकूण स्नान करणाऱ्यांची संख्या १७ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या आकडेवारीनुसार, २८ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत २.३९ कोटी लोकांनी संगमात स्नान केले होते. यामध्ये सुमारे १० लाख कल्पवासी सहभागी झाले होते. तर २७ जानेवारीपर्यंत आंघोळ करणाऱ्यांची एकूण संख्या १४.७६ कोटी होती. अशाप्रकारे, आतापर्यंत १७ कोटींहून अधिक भाविकांनी महाकुंभात स्नान केले आहे.
Mahakumbh 2025 : महाकुंभाला जाणाऱ्या रेल्वेवर जमावाचा हल्ला!
प्रयागराज कुंभमेळ्यात एकूण ६ अमृत स्नाने होतील. महाकुंभमेळ्यातील पहिले अमृत स्नान १३ जानेवारीला, दुसरे अमृत स्नान १४ जानेवारी रोजी मकर संक्रांतीला, तिसरे स्नान २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येला, चौथे शाही स्नान २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला, पाचवे शाही स्नान माघ पौर्णिमेला १२ फेब्रुवारी रोजी होईल आणि शेवटचे शाही स्नान २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीला होईल.
दरम्यान उद्या, बुधवारी २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर अमृत स्नान उत्सवानिमित्त, उत्तरप्रदेश सरकार भाविकांवर पुष्पवृष्टी करणार आहे. सर्व घाटांवर पुष्पवृष्टीची तयारी सुरू आहे. दिवसातून ५ ते ६ वेळा फुलांचा वर्षाव केला जाईल.
सर्वप्रथम, सकाळी ६.३० ते ७ या वेळेत, आकाशातून भाविकांवर फुलांचा वर्षाव होईल. भाविकांची गर्दी लक्षात घेता, पुष्पवृष्टीचे चक्र वाढू शकते अशी माहिती उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.