Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हयाच्या विकासात पत्रकारांची भूमिका महत्वाची - मंत्री नितेश राणे

जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा


सिंधुदुर्ग : राजकीय व्यक्ती आणि पत्रकार यांची संवादाची भूमिका राहिली पाहिजे. अन्यथा गैरसमज निर्माण होऊन जिल्ह्याचे नुकसान होईल. जिल्ह्याचा विकास रखडणार आहे. सिंधुदुर्ग म्हणून आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. व्यक्तिगत द्वेष न ठेवता पत्रकारांनी लिखाण केले पाहिजे. अन्यथा सी वर्ल्ड प्रकल्पासारखे अनेक प्रकल्प रखडतील. यापुढे जिल्ह्याच्या विकासाला तारक ठरणारा कोणताही प्रकल्प मागे जाणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. तसे झाल्यास जिल्ह्यातील एकही तरुण तरुणीला नोकरीसाठी जिल्हा सोडण्याची वेळ येणार नाही, याची ग्वाही आपण देतो, असे प्रतिपादन मत्स्य आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.


सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवन येथे मराठी पत्रकार दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री नितेश राणे बोलत होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून माधव भंडारी तसेच आ निलेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिलकुमार सर्वगोड, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा सचिव बाळ खडपकर यांच्यासह जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार, तालुकाध्यक्ष यांच्यासह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.


यावेळी रमेश जोगळे यांना ज्येष्ठ पत्रकार, वैभव साळसकर, दत्तप्रसाद वालावलकर, कृष्णा ढोलम, सचिन लळीत, भरत सातोसकर, हरिश्चंद्र पवार, काशीराम गायकवाड, मारुती कांबळे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते.


यावेळी पुढे बोलताना मंत्री राणे यांनी, पुढील वर्षापासून जिल्ह्यात एकच पत्रकार दिन साजरा होईल. पोंभूर्ले येथील कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना मानाचे स्थान मिळेल. येथे कोणावरही अन्याय होणार नाही. तसेच यापुढे पोंभूर्ले गावाचे आणि स्थळाचे महत्त्व भविष्यात वाढेल. सिंधुदुर्ग विकासासाठी ही ५ वर्षे महत्त्वाची आहेत. कारण केंद्रात आणि राज्यात एका विचारांचे स्थिर सरकार आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी एका विचाराचे आहेत. त्यामुळे या काळात विकास झाला नाहीतर लोक नाराज होतील. यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे मला सहकार्य हवे आहे, असे आवाहन केले.


सिंधुदुर्ग जिल्हा मागील काही वर्षात विकासात मागे गेला आहे. हा बॅकलॉग भरून काढायचा आहे. जिल्ह्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते शोधण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारिता करावी. जिल्ह्यातील पत्रकारांनी शोध पत्रकारितेवर फोकस करावा. जिल्ह्याचा विकास याला केंद्रबिंदू मानून पत्रकारिता करावी. व्यक्तीला महत्त्व न देता विकासाला प्राधान्य देणारे लिखाण करावे. अन्य जिल्ह्यांतील पत्रकार आपल्या भागाला महत्त्व देणारे, विकास साधणारे लिखाण करतात. त्याचे अवलोकन करून लिखाण करावे, असे आवाहन यावेळी निलेश राणे यांनी बोलताना केले.


सिंधुदुर्गनगरी येथे असलेले पत्रकार भवन महाराष्ट्रातील एकमेव पत्रकार भवन आहे. येथील डॉक्युमेंटेशन आणि ग्रंथ संपदा वाढविण्यासाठी आपण मदत करू. ३४ वर्षे जगलेल्या बाळशास्त्री जांभेकर यांनी वयाच्या २० व्या वर्षी मराठी आणि इंग्रजी मधून दैनिक सुरू केले. या वृत्तपत्रातून त्यांनी परप्रांतीयांची सत्ता धोकादायक असल्याचे मांडले. ते इंग्रजांच्या सरकारमध्ये नोकरी करीत होते. तरीही त्यांनी लिखाण केले. त्यांनी केलेल्या लिखाणामुळे १८५७ चा उठाव झाला. त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा वैचारिक पाया रचला होता. त्यांनीच जनतेच्या मनात पारतंत्र्याविरोधात भावना निर्माण केली. त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील तरुण कोण पुढे येत असल्यास आम्ही त्याला फेलोशिप मिळवून देवू. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा प्रबंध प्रसिद्ध करू, असे प्रमुख वक्ते म्हणून बोलताना माधव भंडारी यांनी सांगितले.


Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर