मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सुरु होणार आहे.या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ही मालिका येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर हा मालिकाविश्वात दमदार कमबॅक करणार आहे. तसेच त्याने त्याची उत्सुकता देखील या निमित्ताने व्यक्त केली आहे.
तू ही रे माझा मितवा मालिकेविषयी अभिजीत आमकर म्हणाला की, या मालिकेतून एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अर्णव आणि ईश्वरी या एकमेकांच्या प्रेमात जितके बुडाले आहेत तितकेच ते एकमेकांचा तिरस्कारही करतात. म्हण्टलं तर एकमेकांशिवाय जगता येत नाही आणि म्हटलं तर एकमेकांसोबत रहाताही येत नाही. थोडक्यात प्रेम करुन कात्रीत सापडलेल्या अर्णव आणि ईश्वरीची हटके लव्हस्टोरी म्हणजे तू ही रे माझा मितवा ही मालिका.
तसेच अभिजीतने त्याच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटलं की, अर्णव सात्विका राजेशिर्के असं मी साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे. मालिकेतील अर्णव हा प्रचंड कष्टाळू, प्रामाणिक पण तितकाच रागीट आणि गर्विष्ठ स्वभावाचा आहे. पुढे अभिजीतने सांगितले कि, अर्णव आणि माझ्या स्वभावात बरंच साम्य आहे. अर्णव प्रमाणेच माझ्या आयुष्यात व्यायामाला प्रचंड महत्त्व आहे. शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातूनही वेळ काढून मी न चुकता व्यायाय करतो.
या मालिकेनिमित्त अभिजीतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने म्हटलं की, स्टार प्रवाह मला माझ्या कुटुंबाप्रमाणेच आहे. ९ वर्षांपूर्वी मी स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा हा योग जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडला जातोय याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे.