संतोष वायंगणकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका मागील पंधरवड्यात पार पडल्या. भाजपा राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आलेला पक्ष, तर शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि महाविकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य, तिसरी आघाडी यांनाही काही निवडणुकीत यश मिळाले. महाराष्ट्राच्या सत्तास्थानावर महायुतीच येणार हे विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्टच झाले. ५ तारखेला महायुतीच्या सत्तास्थापनेचा मुहूर्त जाहीर केला आहे. विधानसभेत मतदारसंघातून विजयी झालेले आमदार आहेत. कोकणातील काही सुपुत्रही मुंबापुरीत गेली काही वर्षे आमदार म्हणून निवडून येत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळातील वरच्या सभागृहात म्हणजेच विधान परिषदेत आजच्या घडीला कोकणातील काही विधान परिषद सदस्य आहेत, तर आताच्या नव्या विधानसभेत २६ कोकणचे सुपुत्र आमदार असणार आहेत. विविध राजकीय पक्षांतून त्या-त्या भागाचे प्रतिनिधित्व करणारे हे सदस्य आहेत. विधान परिषदेत आ. अनिल परब, प्रसाद लाड, भाई जगताप, प्रवीण दरेकर, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, मिलींद नार्वेकर हे कोकणाशी संबंधित विधान परिषदेतील आमदार आहेत, तर विधानसभेत मुंबईत ९ वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड करणारे वडाळा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले कालिदास कोळंबकर हे ज्येष्ठ सदस्य आहेत.
याचबरोबर डोंबिवली मतदारसंघातून निवडून आलेले आ. रवींद्र चव्हाण, आ. संजय केळकर, आ. बाळा नर, आ. सुनील प्रभू, आ. अमित साटम, आ. पराग अळवणी, आ. मंगेश कुडाळकर, आ.अॅड. आशीष शेलार, आ. महेश बळीराम सावंत, आ. मनोज जामसुतकर, आ. अॅड. राहुल नार्वेकर, आ. प्रशांत ठाकूर, आ. सदाशिव थोरवे, रवीशेठ पाटील, आ. महेंद्र दळवी, आ. अदिती तटकरे, आ. भरत गोगावले, आ. योगेश कदम, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, आ. उदय सामंत, आ. किरण सामंत, आ. नितेश राणे, आ. निलेश राणे, आ. दीपक केसरकर हे कोकणातील विविध विधानसभा मतदारसंघांतून निवडले गेलेले सदस्य आहेत. महाराष्ट्र विधिमंडळात कोकणची ताकद वाढली आहे. मुंबई हा देखील कोकणचाच एक भाग आहे. मुंबईत निवडून आलेले आमदार जरी मुंबईतील विविध विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधित्व करीत असले तरीही कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते सुपुत्र आहेत. कोकणातील त्यांच्या त्यांच्या गावांची नाळ त्यांची जोडली गेलेली आहे. यामुळे जरी या आमदारांचे कार्यक्षेत्र मुंबईत असले तरीही त्यांचं गाव कोकणात आहे. यामुळे जरी या सर्व आमदारांची विचारसरणी, राजकीय पक्ष भिन्न असले तरीही कोकणातील कोणत्याही विकास कामांच्या संबंधित जेव्हा-जेव्हा विधिमंडळात चर्चा होईल तेव्हा-तेव्हा कोकणातील या सुपुत्रांचा एकत्रित आवाज बुलंद झाला पाहिजे.
आता पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे सकारात्मकतेचे राजकारण व्हायला हवे. सर्वसामान्य जनतेला सकारात्मकता आणि विकासाचे राजकारण अपेक्षित आहे. कोकणातील ही एकजूट विकासकामांच्या बाबतीत दिसावी. जेणेकरून कोकणचा हा दबाव विधिमंडळात असायला हवा. एवढे सदस्य एकाच विचारधारेचे यापूर्वी १९९५ वगळता कधी आले नव्हते. कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघातून शिवसेना उबाठाचे आ. भास्कर जाधव निवडून आले आहेत. त्याचबरोबर मुंबईतील जोगेश्वरीतून बाळा नर, दिंडोशीतून आ. सुनील प्रभू, माहीममधून महेश बळीराम सावंत, भायखळा येथून मनोज जामसुतकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभेत आमदार म्हणून निवडून आहे आहेत. अन्य निवडून आलेले आमदार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत. विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचे पक्ष वेगवेगळे असले तरीही त्यांचं ध्येय निश्चित असेल. कोकणचा विकास याच उद्देशाने सर्वजण विविध विचारधारेत काम करीत असले तरीही विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येत कोकणच्या विकासात अधिकाधिक जे काही करता येईल यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत.
ज्या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या विभागातील आमदार आपापल्या भागातील प्रश्नांसाठी एकजुटीने प्रयत्न करीत असतात. जेव्हा-जेव्हा कापूस, द्राक्ष, संत्र, डाळिंब, तूर, सोयाबीन आदी पिकांच्या बाबतीत किंवा फळांच्या बाबतीत जेव्हा-जेव्हा नुकसानभरपाईचा विषय येतो, तेव्हा-तेव्हा पक्षीय भेदा-भेद बाजूला ठेवून सर्वजण एकत्र आलेले चित्र आपणाला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिसेल हे असे एकजुटीचे चित्र असंख्य वेळा उर्वरित महाराष्ट्राच्या बाबतीत पाहायला मिळते. या एकजुटीमुळेच गेली अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखानदारी दामदुप्पट अनुदान आणि नुकसानभरपाई शेतकरी आणि कारखानदारांना मिळवत आहेत. जे मिळेल ते पहिले घ्यायचे आणि त्यानंतर जरूर वाद करायचे; परंतु कोकणात काही येण्याअगोदर, मिळण्यापूर्वीच वादंग होतात. त्यातूनच आजवर कोकणचे नुकसान होत राहिले आहे. आताच्या कोकणातील आमदारांमध्ये बरेच तरुण चेहरे आहेत. यामुळे कोकणाने महायुतीला भरभरून दिलयं, त्यामुळे कोकणालाही भरभरून देण्याची जबाबदारी सत्तास्थानावर असणाऱ्या सरकारची असणार आहे. कोकणाने या वेळच्या विधानसभा निवडणुकीत चित्र बदलून दाखवले. आता कोकणचा विकासाला गती देऊन कोकण विकासाच रूपही बदलू दे. विधिमंडळात कोकण आहे. कोकणात विधिमंडळातील सकारात्मक चर्चेचा प्रभाव विकास गंगेच्या रूपाने दिसावा एवढीच अपेक्षा!