
विनोद तावडेंकडे पक्षाने सोपवली आणखी एक जबाबदारी
नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) मतदानाच्या एक दिवस आधी पैसे वाटपाच्या आरोपामुळे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांचे नाव देशभरात चर्चेत आले होते. त्यांनी संपूर्ण प्रकरणाला 'स्वस्तातील नौटंकी' म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना मानहानीच्या नोटिसा पाठवल्या होत्या. या वादाचा भाजपाला (BJP) किती फायदा झाला हे निवडणूक निकालातून दिसून आले. तीन दशकं चालत आलेली ठाकूरांची एकाधिकारशाही संपूष्टात आल्याने याला पैसेवाटप नौटंकीच कामी आल्याची भावना पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वडिलांसाठी श्रीकांत शिंदेंची भावूक पोस्ट मुंबई : महाराष्ट्राचे काळजीवाहू आणि लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री एकनाथ ...
राज्यात मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारी २०२५ अखेर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची नेमणूक होण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचे उत्तराधिकारी म्हणून नियुक्तीच्या प्रक्रियेला पक्षश्रेष्ठींनी वेग दिला आहे. या पदासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येत असतानाच राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजपा संघटना यांच्या समन्वयासाठी बुधवारी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन्ही मोठ्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमून भाजपाने अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अग्रेसर असल्याचे संकेत दिले आहेत.
तावडे यांच्या मदतीसाठी संजीव चौरसिया, संजय भाटिया आणि लाल सिंग आर्य यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र व गोव्याचे निरीक्षक म्हणून सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशभरातील भाजपा मंडल अध्यक्षांची निवडणूक १५ डिसेंबरपर्यंत, तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक ३० डिसेंबरपर्यंत होणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीत एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.
भाजपाचे अन्य पक्षनिरीक्षक
- मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगण: राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांच्यासह सरोज पांडे, गजेंद्र सिंह पटेल आणि अरविंद मेनन
- पश्चिम बंगाल, आसाम, झारखंड आणि हरियाणा: सुनील बन्सल यांच्यासह संजय जयस्वाल, अमित मालवीय आणि राजू बिस्ता
- हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख आणि उत्तराखंड: सौदान सिंह, तसेच श्रीकांत शर्मा, राजकुमार चहर आणि सतीश पुनिया
- केरळ, तमिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक आणि लक्षद्वीप: तरुण चुघ, नलिन कटील, पोन राधाकृष्णन, वनथी श्रीनिवासन
- गुजरात, राजस्थान, पंजाब आणि चंडीगड: राधामोहन अग्रवाल यांच्यासह ऋतुराज सिन्हा, अश्विनी शर्मा
- ओडिसा, अंदमान आणि निकोबार : दुष्यंत गौतम