मुंबईत शेकोटी पेटवण्यावर बंदी

  147

मुंबई : मुंबई थंडीची चाहूल लागली असून महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी थंडीमध्ये जागोजागी शेकोटी पेटवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी शेकोटी पेटवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांना उघड्यावर शेकोटी पेटवता येणार नाही.


वातावरणातील बदलांमुळे मुंबई शहर आणि उपनगरात हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होऊन वायू प्रक्षणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर, वायू प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. मुंबईत थंडीच्या दिवसात सार्वजनिक ठिकाणासह इमारतीच्या बाहेर व चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेकोटी पेटवण्यात येतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषणांमध्ये मोठी वाढ होते. यावर उपाय म्हणून पालिकेने शेकोटी पेटवू नये, असे आवाहन मुंबईकरांना केले आहे. तरीही नागरिक शेकोटी पेटवणार असतील तर, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.


थंडीच्या दिवसांत शहरात पेटणाऱ्या शेकोट्यांना आळा घालण्यासाठी मुंबई पालिकेच्या २५ विभाग कार्यालयाच्या हद्दीत पथक तयार करण्यात येणार असून या टीम रात्रीच्या वेळी शहरात ग्रस्त घालणार आहेत. पहिल्यांदा पकडल्यानंतर समज देऊन सोडण्यात येईल, मात्र त्यानंतर तेथे पुन्हा शेकोटी आढळून आली तर, दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आता शेकोटी पेटवणे चांगलेच महागात पडणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकामाची कामे सुरू आहेत. त्याशिवाय मेट्रो प्रकल्प व अन्य रस्त्याची कामेही सुरू आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी कामगारांकडून स्वयंपाक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर होतो. त्यामुळे धूर निर्माण होऊन प्रदूषण होते. हा वापरही थांबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.



शिवडी, वरळी बीकेसीत अशुद्ध हवा, हवेचा दर्जा ढासळला; मुंबईच्या हवेचा निर्देशांक २२६ वर

मुंबईतील हवेचा निर्देशांक बुधवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदला असून शिवडी, वरळी तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे ‘वाईट’ हवेची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता मंगळवारीही मध्यम श्रेणीत होती. ‘समीर’ ॲपनुसार बुधवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक ११४ वर पोहोचला होता.


मुंबईत सध्या आर्द्रता असल्याने सकाळी प्रदूषके साचून राहतात. समीर ॲपच्या नोंदीनुसार, बुधवारी सकाळी शिवडी येथील हवा निर्देशांक २२६, तर वरळी येथील २२५ इतका होता. तसेच खेरवाडी-वांद्रे २०५, वांद्रे -कुर्ला संकुल हवा निर्देशांक २२५ इतका होता. दरम्यान, मंगळवारी देखील सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली होती.


केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील ०-५० म्हणजे चांगले, ५१-१०० समाधानकारक, १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अत्यंत वाईट आणि ४०० पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते. भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.


दरम्यान, पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ, प्रदूषके यांचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत. पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म काजळीसारखे कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.



हवेचा दर्जा ढासळल्याने अशी घ्या काळजी


प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुरक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र