नागपूर : ऑक्टोबरचा पहिला हप्ता दिल्यानंतर जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे नसतील. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना तयार केल्या जात असतील तर त्याचा राज्यावर परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर हे चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणले पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. समाजातील कोणताही घटक फुकट काही मागत नाही, अशा मुद्द्यांवर महाराष्ट्र मवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना भाष्य केले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला. तर आज नागपूर, भंडारी, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यभरात खूप चर्चा आहे. या योजनेत सध्या महिलांच्या तिसरा हप्ता जमा व्हायला सुरूवात झाली आहे. त्यात लाडकी बहीणवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. असे असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केले आहे. सत्ताधारी स्वत:च्या स्वार्थासाठी अशा योजना तयार करतायत, अशी टीका राज ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे.