मुंबई : ‘बहुजन सुखाय, बहुजन हिताय’ असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाचा गलथान कारभार नेहमीच सुरु असतो. कायम तोट्यात चालणाऱ्या एसटीला गणपती, दिवाळी आणि होळी सारख्या सणाच्या वेळेला आर्थिक उत्पन्न मिळवण्याची संधी असताना नेमके त्याचवेळी एसटीचे कर्मचारी संपासारखे हत्यार उपासून प्रवाशांना वेठीस धरतात. आताही एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता संप पुकारल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तुम्हाला मुलं-बाळं आहेत आणि आमची मुलं-बाळं आज पहाटेपासून रस्त्यावर रडत आहेत. आयाबहीणी आणि वृद्धांची देखील मोठी गैरसोय होत आहे. यामुळे सामानसुमान आणि परिवारासह गावाकडे निघालेले चाकरमानी चांगलेच संतापले आहेत.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे त्याचबरोबर मागील आठ वर्षांपासूनच्या थकीत महागाई भत्ता, घर भाडे भत्ता नक्कीच, व वार्षिक वेतन वाढ करावी अशा प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका (ST Worker Strike) धारण केली आहे. आज सकाळपासूनच एसटी कर्मचारी संघटनेकडून संपाची हाक दिली आहे. अनेक जिल्ह्यातील डेपो मधून एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्यामुळे बाप्पाच्या आगमनासाठी निघालेल्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
एकीकडे ‘प्रवाशांचे होणाऱ्या हालामुळे आम्ही माफी मागतो. परंतु आम्हालाही मुलंबाळं आहेत. आमच्या घरी देखील सण आहेत. परंतु कमी वेतन आणि सरकारकडे केल्या जाणाऱ्या मागण्या अपूर्ण असल्यामुळे आमचेही हाल होत आहेत’, असे म्हणत एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे एसटी बसचे आरक्षण करुनही प्रवाशांचा खोळंबा होत आहे. एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या या भांडणात सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याने प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
प्रवाशांचे म्हणणे काय?
राज्यभरात या आंदोलनाचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. डेपोमध्ये साडे सातची एसटी बस होती. मात्र दोन-अडीच तास होऊनही बस निघत नसल्यामुळे प्रवाशी संतापले असता कर्मचाऱ्यांकडून ही बस कुठेही जाणार नाही, असे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांमध्येही संताप व्यक्त होत आहे. आम्ही मुलाबाळांसह सकाळपासून इथे उभे आहोत. दोन-तीन महिन्यांआधी रिजर्वेशन करुनही एसटीचा पत्ता नाही. एसटी मंडळाकडून आंदोलनाबाबत कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. गणपतीची पूर्व तयारी करण्यासाठी गावाकडे जायचे आहे. परंतु सर्व खासगी गाड्यांसह रेल्वे आरक्षण देखील भरले आहे. त्यामुळे आता आम्ही गावी कसे जायचे, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांकडून सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शाळकरी मुलांचे देखील मोठे हाल झाले आहेत. वस्तीसाठी गेलेल्या बसने प्रवाशी विद्यार्थी शहरात आले असून माघारी जाण्यासाठी बसफेरी नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने संप मिटवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.