मध्य रेल्वेचा निर्णय; ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरू
मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) काही दिवस शिल्लक असताना अनेक ठिकाणी बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यातच लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात (Konkan) जातात. यासाठी गणेशोत्सवाच्या दोन-तीन महिन्याआधीच गाड्यांचे बुकिंग करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी गर्दी होते. मात्र अनेकवेळ रांगेत उभे राहूनही अनेकांना आरक्षण मिळत नाही, यासाठी दरवर्षी मध्यरेल्वेकडून (Central Railway) विशेष गाड्या सोडण्यात येतात. यंदाही मध्य रेल्वेने २०२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता आणखी काही रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मध्य व पश्चिम रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-रत्नागिरी द्वी (०१०३१) साप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्यांचा समावेश असणार आहे. तर पनवेल-रत्नागिरी (०१४४३-०१४४४) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पुणे – रत्नागिरी (०१४४७-०१४४८) साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या, पनवेल रत्नागिरी (०१४४१-०१४४२) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या आणि पुणे – रत्नागिरी (०१४४५) साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
दरम्यान, या गणपती विशेष रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण उद्यापासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर सुरू होईल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.