सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबई : जोरदार पावसामुळे (Heavy rainfall) सध्या मुंबईकरांची (Mumbaikars) फारच तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील पावसाने जोर धरला आहे. मात्र, त्यामुळे एक दुर्घटना घडली. ऐरोलीत (Airoli) अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फूट लोखंडी कमान कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर ३ च्या रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर ही घटना घडली. पावसाचा जोर वाढल्यामुळे ऐरोलीच्या भारत बिजली येथील रेल्वे रुळागत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. या दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ही कमान रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत आहे. यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना ताबडतोब संपर्क साधण्यात आला. रस्त्यावर कोसळलेली कमान ही हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कमान हटवण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. रस्त्यावर कमान कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली. आता या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.