Pune News : खानापूर-मणेरवाडी पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार

  75

कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुलाचे काम ४ वर्षांपासून अर्धवट


पुणे : पर्यटकांसह हजारो नागरिकांची वर्दळ असलेल्या पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर (Khanapur) येथील पुलाचे काम ४ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही पुराच्या काळात पूल पाण्याखाली बुडून पानशेत, सिंहगड भागांतील नागरिकांचा संपर्क तुटणार आहे. तसेच, या अर्धवट पुलामुळे अपघातांची संख्यादेखील वाढण्याची शक्यता आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही खानापूर-मणेरवाडी येथील पुलाचे काम ४ वर्षांपासून अर्धवट आहे. खड्डे, दगड-मातीत खचलेल्या पुलावरून पर्यटकांसह नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे या पुलावर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे.


पुलाचे काम अर्धवट अवस्थेत सोडून ठेकेदार पसार झाला आहे, तेव्हापासून सार्वजनिक बांधकाम विभाग पुलाच्या कामासाठी निधीची मागणी करत आहेत. मात्र, अद्यापही निधी मंजूर झाला नसून बांधकाम विभागदेखील हतबल झाले असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. हायब्रीड अॅम्युनिटी योजनेंतर्गत गडकोटांना जवळच्या अंतराने जोडण्यासाठी पुणे-पानशेत व इतर रस्त्यांच्या कामांसाठी सरकारने सव्वादोनशे कोटी रुपये खर्च केले आहेत. नांदेड फाट्यापासून पानशेतपर्यंत रुंदीकरण करून रस्ता चकाचक केला आहे, त्यामुळे वाहने वेगाने धावत आहेत.



अन्यथा ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा


खानापूर-मणेरवाडी येथील मोठ्या ओढ्यावरील पुलाचे काम मात्र गेल्या काही वर्षांपासून रखडले आहे. अर्धवट पुलामुळे पावसाळ्यात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. गेल्या ३ वर्षांत अनेकवेळा पावसाळ्यात ओढ्याला पूर आल्याने पुलासह रस्ता पाण्याखाली बुडला होता. सुदैवाने दुर्घटना घडल्या नाहीत. ओढ्यात सिमेंट काँक्रिटचे स्लॅब उभे करून पूल उभारण्यात आला आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षणभिंती, कठडे, भराव टाकून पुलावर डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. दरम्यान, पुलाचे काम तातडीने सुरू न केल्यास ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती किसनराव जोरी व संतप्त नागरिकांनी दिला आहे.



पुलासाठी ५० लाखांच्या निधीची गरज


पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी जवळपास ५० लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मात्र, एवढा निधी उपलब्ध होत नसल्याने बांधकाम विभागाने ४ वर्षांपासून हात टेकले आहेत. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असताना पूरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या खानापूर पुलासाठी निधी मिळत नसल्याने नागरिकांत तीव्र संतापाची लाट पसरली आहे, असे खानापूरचे माजी सरपंच शरद जावळकर यांनी सांगितले.



शासनाकडे निधीची मागणी


पुलाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही सुरू आहे. आर्थिक मंजुरीनंतर लवकरात लवकर काम सुरू करण्यात येईल, असे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भंडाऱ्यातलं जेवणं पडलं महागात, संपूर्ण गावाला विषबाधा!

नंदुरबार: नंदुरबार तालुक्यातील भिलाईपाडा या गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सध्या सणा सुदीचा काळ असून

दुबईतील साईभक्ताकडून तब्बल १ कोटी ५८ लाखांचे सुवर्ण दान; सोन्यात घडवली ॐ साई राम अक्षरे

अहिल्यानगर : शिर्डी साई बाबांना हैदराबादमधील आदीनारायण रेड्डी यांनी २००८ साली सुवर्ण सिंहासन दान स्वरूपात दिले

ओबीसींचे उपोषण मागे; राज्य सरकारकडून १४ पैकी १२ मागण्या मान्य

नागपूर : ओबीसी महासंघाकडून नागपुरातील संविधान चौकात साखळी उपोषण सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे

मराठा समाजाचा जीआर सरसकटचा नाही

खरे कुणबी असतील त्यांना आरक्षण मिळेल: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती मुंबई : जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकारने

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के