संविधानावरुन भाजपवर टीका करणार्या विरोधकांना मोदींचा इशारा
पाटणा : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. राजकीय पक्षांकडून (Political Parties) एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याही सभांचा धडाका सुरु आहे. त्यांनी संविधानावरुन (Indian Constitution) केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रसने (Congress) त्यांच्यावर टीकांचा भडीमार केला. या टीकांना आता पंतप्रधान मोदी यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आज बिहारमध्ये (Bihar) निवडणूक सभांना संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत हल्ला चढवला.
काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष संविधान बदलण्याचा आरोप करत भाजपला निशाणा करत होते. यावर ‘खुद्द बाबासाहेब आंबेडकर आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत’, असं पंतप्रधान म्हणाले होते. यावरुनही मोदींना विरोधकांनी लक्ष्य केले. यावर मोदींनी आपल्या पूर्णिया आणि गया येथील सभेत संविधानाच्या मुद्द्यावर विरोधकांना पूर्णपणे घेरले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, संविधानाच्या नावाखाली जे लोक आम्हाला रात्रंदिवस शिव्या देत आहेत, त्यांच्या हातात स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत सत्ता होती. मात्र, बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्याची त्यांची हिंमत नव्हती. तेथे बाबा साहेबांचे संविधान लागू होत नव्हते. हा मोदी आहे, जो संविधानाला समर्पित आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही आपले संविधान मोठ्या थाटात लागू झाले. पुढे सीएएला विरोध करणाऱ्यांना इशारा देत मोदी म्हणाले, हा मोदी आहे, ना घाबरतो, ना झुकतो.
त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत
पूर्णियातील सभेला संबोधित करताना मोदींनी आणीबाणीवरही भाष्य केले. ते म्हणाले, संविधान रद्द करण्याचे आणि संविधान ओलीस ठेवण्याचे काम या लोकांनी केले होते. सत्ता आणि सरकार एकाच कुटुंबाच्या हाती असावे, असे ज्यांना वाटते, त्यांच्या डोळ्यात संविधान खुपते. एवढेच नाही तर, या लोकांनी आता घटनात्मक व्यवस्थेनुसार घेतल्या जात असलेल्या निवडणुकांचे निकाल नाकारण्याची धमकी द्यायलाही सुरुवात केली आहे. मात्र त्यांचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. संविधान हे दलित, मागास आणि आदिवासींची शक्ती बनून कायम राहावे, यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने उभे रहायचे आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.