Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान! २ हजार ७१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचे थैमान! २ हजार ७१६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

वीज कोसळल्याने तिघांचा मृत्यू; १५ जनावरे दगावली


मराठवाडा : राज्यात सगळीकडे उन्हाच्या झळा बसत असताना मराठवाड्यात (Marathwada) मात्र उलट परिस्थिती आहे. या ठिकाणी मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) परभणी (Parbhani) , जालना (Jalna) , नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा फटका बसला आहे. यामुळे आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


मराठवाड्यात प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे २ हजार ७१६ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे. तर ७७७ हेक्‍टरवरील फळ पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. मराठवाड्यात ८४ लहान-मोठी जनावरं दगावली असून, ३५६ घरांची पडझड झाली आहे. गारपीटीमुळे मराठवाड्यातील २०१ गावं बाधित झाली असून, ४ हजार ३०१ शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला आहे.



मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?


छत्रपती संभाजीनगर : १६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
जालना : १३४ हेक्टर पिकांचे नुकसान.
परभणी : ५० हेक्टर पिकांचे नुकसान.
हिंगोली : २९७ हेक्टर पिकांचे नुकसान.
नांदेड : ७४९ हेक्‍टर पिकांचे नुकसान.
बीड : १०२१ हेक्टर पिकांचे नुकसान
लातूर : ५० हेक्टर पेक्षा अधिक पिकांचे नुकसान
धाराशिव : ३०८ हेक्टर पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे.



लातूर जिल्ह्यात ९ जनावरे दगावली


लातूर जिल्ह्यात तीन दिवस सातत्याने मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे जिल्हाभरात २५ एकर पेक्षा जास्त फळबागेचं आणि शेतीचं नुकसान झालं आहे. तसेच, जिल्ह्यात ९ जनावरे दगावली आहेत.



बीड जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू, तर लहान मुलगा जखमी


बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे वीज पडून मीना गणेश शिंदे या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, यामध्ये ओमकार शिंदे हा पंधरा वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेजण शेतामध्ये काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आणि हा अपघात घडला.



परभणी वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू


परभणी जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर ६ जनावरांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी आंबा फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसानही झाले आहे. वीज पडून गंगाखेड तालुक्यातील ईळेगाव येथील ५५ वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर, सोबत असणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. तसेच, सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथील हरिबाई सुरनर यांचाही वीज पडून मृत्यू झाला.

Comments
Add Comment