काँग्रेसची होत असलेली फरफट आणि काही नेत्यांच्या गलिच्छ राजाकारणाला कंटाळून पक्ष सोडला : राजू वाघमारे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (Congress) अनेक बड्या बड्या नेत्यांनी पक्ष सोडून महायुतीला साथ दिली. त्यामुळे काँग्रेसला धक्क्यांवर धक्के पचवावे लागत आहेत. त्यातच आता मुंबईतील आणखी एका मोठ्या नेत्याने काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळी काँग्रेसला भगदाड पडलं आहे. काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत राजू वाघमारे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राजू वाघमारे दीर्घकाळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. माध्यमांमध्येही त्यांनी पक्षाची भूमिका अनेकदा जाहीरपणे मांडली होती. अशातच आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कास धरली आहे.
राजू वाघमारे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का? असा प्रश्न आहे. संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिमची सीट मागितली. मात्र, त्यांच्यावर दबाव आणत पक्षाबाहेर काढलं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत सांगावं लागतंय की सीट आमची आहे. भिंवडीची सीट थेट शरद पवारांनी जाहीर केली. याचा परिणाम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही काय आहे? त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करतोय.”
“मागील दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी मोठी कामगिरी केली आहे. ते कॉमन मॅन सीएम आहेत. भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काम करणाऱ्यात मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. काँग्रेसमध्ये असताना शिंदे यांच्यासंदर्भात सर्व्हे असताना मी जाहीरपणे मान्य केलं होतं. ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो. जो 20-20 तास काम करतो, असा मुख्यमंत्री आवडणारा असणार असं मी चॅनलवर सांगितलं होतं. तेव्हा माझ्यावर टीका झाली, मात्र जे खरं आहे तेच मी बोलतो.”, असं राजू वाघमारे म्हणाले.
बाकी सर्व एसीमधले नेते, मुख्यमंत्री तळागाळातले नेते : राजू वाघमारे
“मी माझं भाग्य समजतो की, मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली. छत्रपतींचं स्वप्न साकार करण्यासाठी मी शिंदेंसोबत आहे. काँग्रेस पक्ष, उबाठातील हजारो कार्यकर्ते आहेत, ज्यांना नेता नाही. हे सर्व एसीमधले नेते आहेत, शिंदे तळागळातले नेते आहेत.”, असंही राजू वाघमारे म्हणाले आहेत.