Friday, May 15, 2026

Gaurav Vallabh Resigns: काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा झटका! प्रवक्ता गौरव वल्लभ यांची पक्षाला सोडचिठ्ठी!

Gaurav Vallabh Resigns: काँग्रेसला निवडणुकीपूर्वी मोठा झटका! प्रवक्ता गौरव वल्लभ यांची पक्षाला सोडचिठ्ठी!

म्हणाले, मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. तसेच...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) तोंडावर आली असताना काँग्रेस पक्षाला अनेक धक्के सहन करावे लागत आहेत. बडे-बडे नेते पक्षाची साथ सोडत असताना त्यातच काँग्रेस नेते आणि प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी पक्षाच्या सर्व पदांवरुन राजीनामा दिला आहे. 'मी सनातन विरोधी घोषणा देऊ शकत नाही. तसेच देशाची संपत्ती निर्माण करण्यांबाबत चांगल बोलताही येत नाही' अशी खंत व्यक्त करत काँग्रेस पक्षातील सर्व पदांचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे गौरव वल्लभ यांनी स्पष्ट केले.

गौरव वल्लभ यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे की, पक्षाच्या ग्राऊंड लेवल कनेक्ट पूर्णपणे तुटला आहे. मी भावनिक आहे. मन व्यथित आहे. मला खूप काही सांगायचे आहे. मला लिहायचे आहे. परंतु माझी मूल्ये मला इतरांना दुखावतील असे काहीही बोलण्यास मनाई करतात. तरीही, आज मी माझे मत तुमच्यासमोर मांडत आहे, कारण मला वाटते की सत्य लपवणे हा देखील गुन्हा आहे आणि मला या गुन्ह्याचा भाग व्हायचे नाही.

पक्षाच्या भूमिकेने मला अस्वस्थ केले

'मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक आहे. पक्षाने मला राष्ट्रीय प्रवक्ता बनवले तेव्हा मी माझे मत ठामपणे मांडले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या भूमिकेमुळे मी अस्वस्थ होतो. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला वाटले की हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. येथे तरुण, बुद्धिजीवी लोकांच्या विचारांना महत्त्व दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षात माझ्या लक्षात आले की पक्षाचे सध्याचे स्वरूप तरुणांना नव्या कल्पनांसह सामावून घेण्यास सक्षम नाही. पक्षाचा ग्राऊंड लेव्हल वर संपर्क तुटला आहे. नव्या भारताच्या अपेक्षा तुम्ही समजून घेऊ शकत नाही. त्यामुळे ना पक्ष सत्तेत येऊ शकला आहे ना विरोधी भूमिका ठामपणे पार पाडत आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निराश करत असल्याचे गौरव वल्लभ यांनी सांगितले.

पक्षाची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू आहे. तर एकीकडे आपण जातीवर आधारित जनगणनेबद्दल बोलतो व दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे पक्षाच्या लोकांमध्ये विशिष्ट धर्माचे समर्थक असल्याची प्रतिमा निर्माण होते, असे गौरव वल्लभ म्हणाले.

काँग्रसने रामल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून स्वत:ला दुर ठेवले, यावर देखील गौरव वल्लभ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी जन्माने हिंदू आहे आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पक्ष आणि आघाडीशी संबंधित अनेक लोक सनातनच्या विरोधात बोलतात आणि त्यावर पक्ष गप्प बसतो. एक प्रकारे, मौन संमती देण्यासारखे आहे. असे गौरव वल्लभ यांनी म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा