नवी मुंबई(प्रतिनिधी): तुर्भेगावात पूर्वापार डॉ. सीताराम विश्वनाथ सामंत यांच्या पुढाकाराने व गावातील ग्रामपंचायत काळातील सरपंच जोमा बाळू म्हात्रे , दशरथ दत्तू घरत, रामकृष्ण बाळू पाटील , डी.आर.पाटील, गावचे पोलीस पाटील लक्ष्मण हिरा पाटील यांच्या काळापर्यंत तुर्भेगावात एक गाव एक होळी म्हणूनच गावातील ही एकता एकात्मता दृढमूल व्हावी या जाणिवेतून गेली दहा वर्षांपासून फोर्टी प्लस क्रिकेटचे संस्थापक प्रदीप पाटील यांच्या पुढाकाराने तुर्भे गावात एक गाव एक होळीची जुनी परंपरा पुन्हा सुरु झाली. काल उत्साहात संपन्न झालेल्या या होळीकोत्सवात गावातील जुन्या रुढी परंपरा साजऱ्या करताना सर्व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.
तांदळाच्या पापड्या, करंज्या व पुरणपोळीचे नैवद्य आणि साखरेच्या माळा होळीला अर्पण करण्यात आल्या तर रात्री पारंपरिक नागेली नृत्यावर फेर धरीत आबाळ वृद्धांनी एकीचे दर्शन करुन दिले.होळीनिमित्त संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या नंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची ,चमचा लिंबू स्पर्धा विविध कार्यक्रम झाले यातही गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.होळी पेटवण्याचा मान दरवर्षीप्रमाणेयावर्षीही मंगल पोपट पाटील व गोपीनाथ पाटील यांना देण्यात आला होता.त्यानुसार रात्री साडेअकरा वाजता गावचा मानकरी म्हणून बाळारामबुवा पाटील यांच्या हस्ते होळीची पूजा करुन होळीला अग्नी दिला.
यावेळी सर्व गाव गुलालात न्हाऊन निघाला होता. यावेळी नवीन जावई बापूंचा ग्रामस्थांच्या वतीने हृदय सन्मान करण्यात आला.याप्रसंगी जेष्ठ् नगरसेवक चंद्रकांत पाटील,विवेक पाटील,शुभांगी पाटील, शशिकला पाटील,रामचंद्र घरत आदी उपस्थित होते. यंदाचा होळीकोत्त्सव कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात तुर्भे ग्रामस्थांच्या वतीने गोपीनाथ पाटील, ललित म्हात्रे, साईनाथ पाटील, वसंत भरत पाटील, वसंत भिवा पाटील, विकास मोकल आदींनी विशेष मेहनत घेतली.यावेळी एपीएमसी पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा कार्यक्रम यशस्वी पडण्यासाठी सहकार्य केले.