
अजितदादांचा 'तो' शब्द खरा ठरणार का?
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (National Congress Party) एक गट महायुतीत (Mahayuti) सामील झाल्यानंतर शिरुरची जागा (Shirur constituency) लोकसभेसाठी (Loksabha) राष्ट्रवादीला देण्यात आली. त्यामुळे शिरुरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) अशी लढत पाहायला मिळणार आहे. याकरता शरद पवार गटाकडून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे निवडणूक लढवणार हे निश्चित झालं होतं. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून शिरुरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार ठरत नव्हता. आज या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. दिलीप मोहिते पाटील यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
दिलीप मोहिते पाटील आणि अजित पवार यांच्यात नुकतीच बैठक पार पडली, यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. अजित पवारांच्या विनंतीचा आपण मान राखणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मोहिते म्हणाले, "आढळराव आणि आमच्यामध्ये जो संघर्ष होता, तो अतिशय पराकोटीचा संघर्ष होता. याचा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात आढळरावांसोबत जाण्याबाबत अनेक शंका-कुशंका होत्या. त्यांच्या मनातील हा संभ्रम अजित पवारांनी दूर करावा यासाठी त्यांच्यासोबत आम्ही बैठक घेतली. माझ्या घरीच ही बैठक पार पडली. यावेळी अगदी मनमोकळेपणाने त्यांच्याशी कार्यकर्त्यांसह चर्चा झाली"
शेवटी पक्षासाठी काही निर्णय घ्यावे लागतात
पुढे ते म्हणाले, आढळराव पाटील यांची राजकीय कारकीर्द आंबेगाव तालुक्यात सुरु झाली. याठिकाणी वळसेपाटलांचा त्यांच्याशी कायम संघर्ष राहिला होता. पण वळसे पाटलांनी यामध्ये स्वतःची भूमिका बदलली आहे. त्यामुळे मलाही यात काही वाटत नाही, शेवटी पक्षासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आज मी जो कोणी आहे तो केवळ अजित पवारांमुळे आहे. जर अजित पवार हे माझे कुटुंब प्रमुख असतील तर मला त्यांचं ऐकावं लागेल. यापूर्वी मी म्हटलं होतं की, पक्ष जरी आढळरावांसोबत गेला तरी मी जाणार नाही. पण आता अजित पवारांनी माझ्या कार्यकर्त्यांसह सर्वांशी मनमोकळी चर्चा केली. त्यामुळे मी तडजोड करायला तयार आहे.
अजितदादांचा 'तो' शब्द खरा ठरणार का?
शिरुरमधून आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे. तसेच महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांचं नाव निश्चित आहे. अमोल कोल्हेंबाबत भाष्य करताना अजितदादा म्हणाले होते की, त्यांना आम्ही शिरुर मतदारसंघात पाडणार म्हणजे पाडणारच. त्यामुळे पुन्हा एकदा शिरुर लोकसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत आपल्याला पहायला मिळेल. अजितदादांनी दिलेलं ते आव्हान खरं ठरणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.