'बॉयकॉट मालदीव'च्या पार्श्वभूमीवर कलाकारांनी केले ट्वीट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच लक्षद्वीप (Lakshadweep) दौरा केला. यावेळेस त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो चर्चेचा विषय ठरले. लक्षद्वीप हा इतका ट्रेंडिंग विषय बनला की गुगलवर सर्वाधिक सर्च होणारा दहावा शब्द 'लक्षद्वीप' हा होता. मात्र, लक्षद्वीपच्या सौंदर्यावर मोदींनी भाष्य केल्यानंतर मालदीवच्या नेत्यांनी भारतासंबंधी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर खवळलेल्या नेटकऱ्यांनी मालदीवला बायकॉट (Boycott Maldives) करण्याचा ट्रेंड (Trend) सुरू केला. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप पर्यटन स्थळाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी (Bollywood celebrities) यासाठी त्यांना पाठिंबा दिला आहे.
सलमानचं ट्वीट चर्चेत
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने ट्वीट केलं आहे की,"आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना लक्षद्वीपच्या सुंदर, स्वच्छ आणि आश्चर्यकारक समुद्रकिनाऱ्यांवर पाहणे खूप छान आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा समुद्रकिनारा आपल्या भारत देशात आहे".
खिलाडीनेही केलं ट्वीट
अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिलं आहे, "मालदीवमधील प्रमुख पक्षाच्या व्यक्तींनी भारतीयांबद्दल द्वेषपूर्ण आणि वर्णद्वेषी टिप्पण्या केल्या. ज्या देशाने मालदीवला जास्तीत जास्त पर्यटक पाठवले, त्या देशाबद्दल ते असे बोलत आहेत, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून आहोत, पण आपण असा अनाठायी द्वेष का सहन करावा? मी मालदीवला अनेक वेळा भेट दिली आहे आणि नेहमीच त्याची प्रशंसा केली आहे, परंतु प्रथम सन्मान महत्त्वाचा. चला #ExploreIndianIslands चा निर्णय घेऊया आणि आपल्या भारताच्या पर्यटनाला पुढे नेऊया", त्याच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
क्वीन कंगना म्हणते 'हे' लज्जास्पद आहे...
अनेक गोष्टींमध्ये आपलं मत परखडपणे मांडणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रनौतने ट्वीट केलं आहे, "गंध? स्थायी गंध? लक्षद्वीपमध्ये ९८% मुस्लिम समाज आहे. लक्षद्वीपमध्ये ६० हजार लोक राहतात. पण तरीही हे अज्ञात बेट आहे हे लज्जास्पद आहे".
जॉन अब्राहम, श्रद्धा कपूर आणि मधुर भंडाकरनेही केलं ट्वीट
जॉन अब्राहमने ट्वीट केलं आहे,"अतिथी देवो भव या कल्पनेने आणि विशाल सागरी जीवनाचा शोध घेऊन लक्षद्वीप हे खरोखरच भेट देण्यासारखे ठिकाण आहे".
श्रद्धा कपूरने ट्वीट करत लिहिलं आहे,"सर्व फोटो मला लक्षद्वीपला भेट देण्यासाठी उत्सुकता वाढवणारे आहेत. खरोखरंच हा एक कमाल समुद्रकिनारा आहे. आता फक्त सुट्टीची प्रतीक्षा आहे".
मधुर भंडाकरने लिहिलं आहे,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून लक्षद्वीपच्या मनमोहक समुद्रकिनाऱ्याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यांच्या या दौऱ्याने मंत्रमुग्ध केलं आहे".
दोन्ही देशांच्या राजकीय आणि पर्यटन क्षेत्रावर होणार परिणाम
भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक वादामुळे केवळ द्विपक्षीय संबंधच ताणले गेले नाहीत, तर राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या महत्त्वावर जोर देणारे आणि भारतीय पर्यटनाला पाठिंबा देणारे सेलिब्रिटी आणि प्रभावशाली व्यक्तींच्या वक्तव्यामुळे या वादाचे दोन्ही देशांच्या राजकीय आणि पर्यटन क्षेत्रावर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता आहे.