- प्रासंगिक : शांताराम वाघ
जगभर काटकसर किंवा बचत दिन ३१ आक्टोबरला साजरा होतो. भारतात तो ३० आक्टोबरला साजरा होतो. नुकताच हा दिन साजरा झाला. या दिनाच्या निमित्ताने बचतीचा घेतलेला आढावा व या दिनाचे महत्त्व…
जागतिक बचत बँकेत १९२४ साली मिलान इटली येथे पहिली काँग्रेस भरली होती. या काँग्रेसमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ आॅक्टोबर १९२४ ला जागतिक बचत किंवा काटकसर दिन जगभर साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. त्याचा अंमल प्रत्यक्षात १९२५ साली झाला.
याचा स्वीकार अमेरिकेतील व स्पेनमधील बँकांनी घेतला. या मागे नागरिकांचे जीवनमान सुधारणे हाच होता. १९२१ सालीही अशा प्रकारचा प्रयत्न झाला होता; परंतु जर्मनीमध्ये १९२३ मध्ये आलेल्या आर्थिक मंदीमुळे तेथील नागरिकांनी याकडे त्यावेळी पाठ फिरविली. त्यानंतर हळूहळू सुधारणा होत गेल्याने तेथील नागरिकही कालांतराने समाविष्ट झाले. नागरिकांचे जीवन सुखकर व्हावे, उतारवयात आर्थिक तरतूद असावी, भविष्यातील आर्थिक तरतूद, मुलांच्या शिक्षण व मुलींच्या लग्नासाठी लागणारे खर्च, आजारी व वृद्धत्वातील तरतूद, यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. आपण एकदम काहीही करू शकत नाही. अनेक कुटुम्बात थोडे थोडे सोने घेण्याची प्रथा आहे. याचा उपयोग मुलींच्या लग्नाच्या वेळी होऊ शकतो. एकदम सोने घेणे शक्य होत नाही. थोडी थोडी बचत केल्यास त्याचा उपयोग मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सद्धा होऊ शकतो. आज अनेक ठिकाणी खासगी नोकरीत अशाश्वतीचे जीवन असते. अशा वेळी काही अघटित घडल्यास व नोकरीला मुकावे लागल्यास अल्पबचतीचा उपयोग कामी येतो. काही वेळा गंभीर आजाराने ग्रासले जाते अशा वेळी या साठलेल्या पैशाचा उपयोग होतो. या दृष्टीने अनेक बचत बँकेमध्ये अनेक प्रकारच्या बचतीच्या स्कीम आस्तित्वात असतात. भारतातील पोस्ट खाते या दृष्टीने कार्यतत्पर आहे. दरमहा बचत खाते (रिकरिंग डिपॉझिट), सुकन्या बचत योजना इत्यादी.
भारतात सुद्धा हा बचत दिन मोठ्या प्रमाणांत साजरा केला जातो. विविध प्रकारची पोस्टर्स व हंडबिले यामधून प्रचार केला जातो. बँका जास्तीत जास्त बचत करावी या द्रष्टीने अनेक योजना जाहीर करतात जेणेकरून नागरिक जास्तीत जास्त बचत करतील. या दिवशी अनेक सरकारी उपक्रमही सुद्धा आखले जातात व बचतील प्रोत्साहन दिले जाते. यामध्ये स्त्रियांच्या विविध संघटना, व्यावसायिक, शाळा व खेळांच्या संघटना भाग घेतात. भारतात मात्र १९८४ नंतर हा दिवस ३० आॅक्टोबरला साजरा केला जातो. ३१ आक्टोबर १९८४ला पंतप्रधान इंदिरा गांधींचे निधन झाल्यामुळे त्यानंतर अल्पबचत दिवस ३१ ऐवजी ३०ला साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. नॅशनल सेविंग्ज इन्स्टिट्यूट देशांत विविध प्रकारचे बचत कार्यक्रम आखत असते व नागरिकांना याचे महत्त्व पटवून देण्याचे महत्त्वाचे कार्य करत असते. अनेक शाळामधूनही मुलांना बचतीचे महत्त्व पटविले जाते. २०१४नंतर मोदी सरकारने नागरिकांची बचत खाती उघडण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. यामुळे देशांत ३३ कोटींहून अधिक नागरिकांनी बँकेत खाती उघडली व नागरिकांनी या खात्यात एक लाखाहून अधिक रुपयाची गुंतवणूक केली. अल्पबचतीमुळे वैयक्तिक फायदा होतोच… पण राष्ट्राला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. लोकमान्य टिळकांच्या कारकिर्दीत पैसा फंड कारखाना लोकांकडून पैसे गोळा करून निर्माण केला गेला. हे बचतीचे ज्वलंत उदाहरण आहे. आपणही नियमित बचत करूया व आपल्या भावी काळाच्या सुखासाठी प्रयत्न करूया आपल्याबरोबर राष्ट्राचाही बचत निश्चितच होणार आहे.