टोलनाक्याच्या मुद्द्यावरुन मनसेचा इशारा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलच्या झोलची (Toll scam) जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल आकारला जातो या विधानाला विरोध करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची टोल प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भेट घेतली आणि सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात आला. टोल आकारणीबाबत अनेक सकारात्मक निर्णय यावेळेस घेण्यात आले.
टोलनाक्यांवरुन दिवसभरात किती वाहनांची ये-जा होते यावर सरकारच्या कॅमेर्यांमार्फत लक्ष ठेवले जाणार आहे, असाही एक निर्णय घेण्यात आला. पण यासोबतच मनसेही आपल्या कॅमेर्यांद्वारे या गाड्यांवर लक्ष ठेवेल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला. राज्य सरकारने राज्यातील मुख्य टोलनाक्यांवर काल रात्री कॅमेरे लावले आहेत. तर आता पुढच्या दोन ते तीन दिवसांत मनसेचेही कॅमेरे लागतील, त्याच्यानंतर टोल नाक्यांवरील गाड्या मोजायचं काम अधिकृतरित्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे होईल, असं मनसेतर्फे सांगण्यात आलं आहे.
राज्य सरकार टोल घेणार असेल तर लोकांना कोणत्या सोयीसुविधा दिल्या गेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी होतेय का हे पाहण्यासाटी मनसेकडून टोल नाक्यांवर कॅमेरे लावण्यात येत आहेत. त्या माध्यमातून टोल नाक्यावरून किती गाड्या जातात हे कळेल. तसेच टोलनाक्यांवर लावलेल्या कॅमेर्यांचं कंट्रोल मंत्रालयात असणार आहे, त्यामुळे तिथे लोकांना काय त्रास होतोय ते कळेल. यलो लाईनच्या पुढे वाहनांच्या रांगा गेल्या तर वाहनांचा टोल न घेता टोलवरून वाहने सोडली जातील. किती टोल आहे, किती भरले गेले, जमा किती झाले हे सगळं लोकांसमोर येईल यासाठी दोन्ही बाजूने बोर्ड लावले जातील.