मुंबई: मुंबईतील जल्लोषाचा सण म्हणजे नवरात्री. नवरात्रीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यात मोठ्या संख्येने आयोजक दांडिया तसेच गरबाचे आयोजन करत असतात. दरम्यान, या आयोजकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
आयोजक ज्या ठिकाणी गरबा आणि दांडियाचे आयोजन करत आहेत त्या ठिकाणी सहभागी नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करणे बंधनकारक असल्याचे निर्देश राज्य सरकारने दिलेत.
रास दांडिया खेळताना अनेकदा नागरिक बेभान होऊ नाचतात. त्यांना कसलेच भान राहत नाही. यामुळे अनुचित प्रकारही घडण्याची शक्यता असते. अनेकदा नाचताना हृदयावर ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशा दुर्देवी घटना याआधीच घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक सुविधा तसेच रुग्णवाहिका तैनात करण्याचे निर्देश दिलेत.