नवी दिल्ली: इस्त्रायलवर(israel) दहशतवादी संघटना हमासने केलेल्या हल्ल्यानंतर बुधवारी पाचव्या दिवशीही युद्ध सुरू आहे. यातच भारताने इस्त्रायलमधील भारतीयांच्या परतण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू करण्याची घोषणा केली आहे.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोशल मीडियावर लिहिले की, इस्त्रायमधून भारतात येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ऑपरेशन अजय लाँच करत आहे. स्पेशल चार्टर फ्लाईट आणि इतर प्रकारची व्यवस्था केली जात आहे. परदेशात राहणाऱ्या आपल्या नागरिकांच्या सुरक्षा आणि चांगल्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रतिबद्ध आहोत.
एस जयशंकर यांच्या पोस्टवर इस्त्रायलमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले की ज्या भारतीय नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे त्यांना उद्या गुरूवारी स्पेशल फ्लाईटसाठी मेल केले आहे. त्यानंतर उड्डाणासाठी इतर नागरिकांना मेसेज पाठवले जातील. न्यूज एजन्सी पीटीआयने मुंबईत इस्त्रायलच्या महावाणिज्य दूत कोबी शोशानी यांच्या हवाल्याने सांगितले की इस्त्रायलमध्ये २० हजाराहून अधिक भारतीय आहेत.
शनिवारी सकाळी हमासने इस्त्रायल देशावर रॉकेट हल्ला केला होता. या दरम्यान हमासने घुसखोरी केली तसेच सामान्य नागरिकांना आपल्या निशाण्यावर ठेवले होते. यानंतर इस्त्रायलने हमासला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. इस्त्रायलकडून गाझावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. तर हमासही इस्त्रायलच्या दिशेने रॉकेट सोडत आहे