मुंबई: गेले अनेक दिवस दडी मारून बसलेला पाऊस (monsoon) अखेर पुन्हा कोसळत आहे. राज्यात पुढील दोन दिवस म्हणजेच ८ आणि ९ सप्टेंबरला मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पेरणी केलेला शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाला सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान, मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाची सुरूवात झाली आहे. गुरुवारपासूनच मुंबईत तसेच ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात पावसाचा जोर अधिक वाढू शकतो असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पुन्हा पावसाच्या सरी कोसळत आहे.
यंदाच्या वर्षात ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा गेला. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले. लावलेली पिके करपून जात असल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत होता. अखेर पावसाचे पुनरागमन झाले आहे.