Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Maratha samaj Andolan : मराठा आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत एसटीचे तब्बल ४ कोटींचे नुकसान

Maratha samaj Andolan : मराठा आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत एसटीचे तब्बल ४ कोटींचे नुकसान

१९ एसटी गाड्या थांबवून करण्यात आली जाळपोळ


जालना : जालना (Jalna) येथे शुक्रवारी आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Samaj Reservation) आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व गोळीबार केला. या घटनेचे तीव्र प्रतिसाद अख्ख्या राज्यात उमटत असून मराठा आंदोलक (Maratha Andolan) अधिक आक्रमक झाले आहेत. काही ठिकाणी रास्ता रोको (Rasta Roko) तर काही ठिकाणी जाळपोळ करत निषेध नोंदवण्यात येत आहे. सरकारने यावर सखोल चौकशीचे व कारवाईचे आदेश दिलेले असले तरी मराठा आंदोलकांचा रोष मात्र कायम आहे. यातूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तब्बल १९ बसेसची (ST Buses) तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. एसटी महामंडळाचे जवळपास ४ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे महामंडळातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


जालन्यात आज रविवारीही प्रचंड तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी मराठा समाजाला पाठिंबा दर्शवला आहे, मात्र म्हणावी तितकी ठोस पावले उचलली गेलेली नाहीत त्यामुळे दोन दिवसांनंतरही वातावरण तापलेलेच आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी रास्तारोका केला. एसटी महामंडळाच्या काही गाड्या जाळण्यात आल्या, तर काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली. महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठिकठिकाणी बस थांबवून नुकसान करण्यात आले. आतापर्यंत १९ गाड्यांची जाळपोळ झाली आहे. महामंडळाला यामुळे अंदाचे ४ कोटींचे नुकसान झाले आहे.



काही बस फेऱ्या करण्यात आल्या रद्द


राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलकांची निदर्शने सुरु आहेत. मुंबईमध्ये देखील मराठा आंदोलक निदर्शने करणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको आंदोलन करत आज सकाळी दहा ते अकरा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा इशारा देण्यात आल्याचीही माहिती आहे.


या गरम वातावरणामुळे व झालेल्या नुकसानामुळे एसटी महामंडळाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जालन्यासह नांदेड जिल्ह्यातील बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यातील बस फेऱ्यांवर याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. रविवारीही मराठा आंदोलकांचा संताप कायम असल्याने बस स्थानकांमधून कमी गाड्या बाहेर काढल्या जाण्याची शक्यता आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment