जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल
गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला व विरोधकांच्या आघाडीला लगावले टोले
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कंबर कसून तयारीला लागले आहेत. आज मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीची (Opposition Parties Alliance) बैठक पार पडली तर महायुतीच्या (Mahayuti) बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजप यांची मुंबईच्या वरळी येथे बैठक सुरू आहे. या बैठकीत बोलताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ठाकरे गटाला व विरोधकांच्या आघाडीला जबरदस्त टोले लगावले आहेत.
गुलाबराव पाटील म्हणाले, २५ वर्षांच्या राजकारणात गेली ४ वर्ष याआधी कधीच आली नाहीत. सुरुवातीला ३ जणांचे लव्ह मॅरेज झाले. त्यानंतर देवेंद्रभाऊंनी आम्हाला बोलावले, त्यांच्यासोबत बसलो. आता तिसरे इंजिन दादांनी जोडले. अजितदादा आल्यामुळे गद्दार, खोके बंद झाले. आम्ही घराच्या बाहेर निघालो की सगळे गद्दार, खोके म्हणायचे पण अजितदादा तुमची काय दहशत आहे, तुम्हाला कोणीही गद्दार म्हणत नाही.
गुलाबराव पाटील म्हणाले, २०२४ मध्ये भगवा फडकणार आहे. आज महायुतीचा संकल्प हाच आहे की २०२४ मध्ये ४८ जागा निवडून आणायच्या आहेत. दादा आम्ही कार्यकर्ते म्हणून जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु पण आमच्यावेळेस लफडी नको व्हायला. वरती मोदीसाहेब म्हटलं की कोणीही मतदान करतं. शिंदे साहेब आगे बढो, फडणवीससाहेब आगे बढो, दादा एकच वादा आता असं म्हणायचं नाही. आता महायुती आगे बढो असं म्हणायचं. ‘महायुती तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ सध्या ही गरज आहे. ३ जणांच्या सरकारमध्ये ४८ जागांचा संकल्प करूया. १ रिक्षात आम्ही ४० गावात प्रचार करायचो. त्याकाळात आम्ही काम केले आहे. राष्ट्रवादी आपल्यासोबत असल्याने ४८ जागा निवडून आणण्यास महायुती कमी पडणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
तुमचं घड्याळ आमच्याबरोबर चाललं पाहिजे
आम्ही भाजप विरोधात कमी लढलो, पण राष्ट्रवादी विरोधात आयुष्यभर लढलो, आता सांभाळून घ्या. तुमचं घड्याळ आमच्याबरोबर चाललं पाहिजे. या तीन जणांच्या सरकारमध्ये ४८ जागांचा संकल्प आहे. जळगाव जिल्ह्याने कायम २ खासदार महायुतीला दिलेत. यापुढेही देऊ. कार्यकर्ते म्हणून प्रामाणिकपणे कामे केली तर यश नक्की मिळेल. आयुष्यभर हे काम केलं आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
दादा आल्याने आमची ताकद वाढली; आता जो आडवे येईल त्याला तुडवून पुढे जाऊ
गुलाबराव पाटील यांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. आपल्याला जो आडवा येईल त्याचा सत्यानाश होईल, असे ते म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत नाराजीनाट्य पाहायला मिळाले. ममता बॅनर्जी उठून निघाल्या होत्या. शरद पवारांनी समजावून बसवले. आत्ताच ही परिस्थिती आहे. त्यामुळे पुढे जाऊन काय होईल माहिती नाही. आपण सगळे एकजूट राहिलो तर ४८ पैकी ४८ जागा जिंकू. जो कोणी आपल्या आडवे येईल त्याला तुडवून पुढे जाऊ असंही गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या सभेत सांगितले.