
नवी दिल्ली : दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षांना (Board Exams) शालेय व महाविद्यालयीन स्तरावर फार महत्त्व दिलं जातं. यात मिळालेल्या गुणांवर पुढील शैक्षणिक जीवन अवलंबून असतं. या बोर्ड परीक्षांसंदर्भात शिक्षण मंत्रालयाने (Education Ministry) मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना दोघांमधील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी उपलब्ध असणार आहे. यानुसार आता २०२४ च्या शैक्षणिक सत्रासाठी नवीन पाठ्यपुस्तके तयार केली जात आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे अकरावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना कला, विज्ञान व वाणिज्य असं शाखानिहाय नव्हे तर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत. शिवाय वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार असणाऱ्या या परीक्षांमध्ये ज्या विषयांचा अभ्यास झालाय, फक्त त्याच विषयाची परीक्षा देण्याची मुभा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच एकाच वेळी सर्व विषयांचीही परीक्षा दोन वेळा देता येणार आहे. निकालानंतर ज्या प्रयत्नामध्ये सर्वोत्तम गुण मिळाले असतील अशा गुणांचा विचार अंतिम निकालासाठी केला जाणार आहे.
अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करावा लागणार आहे. या दोन्ही भाषांपैकी एक भाषा ही भारतीय भाषा असणे अनिवार्य असणार आहे. आताच्या बोर्डाच्या पद्धतीनुसार, विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील भार कमी व्हावा यासाठी हा नवा पॅटर्न राबविण्यात येणार आहे. शिक्षणाच्या या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आकलन आणि यशाचे मूल्यांकन करता येईल. त्यामुळे परीक्षा पद्धत आणखी सोपी झाली आहे.