पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा
मृतांचा आकडा २८८ वर, ५६ गंभीर
बालासोर: ओडिशाच्या बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांची संख्या २८८ वर पोहोचली आहे. तर ७४७ लोक जखमी आहेत आणि ५६ जणांची प्रकृती गंभीर आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळावर जाऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याशिवाय मोदींनी रूग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. "अपघाताला कारणीभूत असलेल्यांना सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल", असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
जखमींची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, ओडिशा सरकार आणि येथील अधिकाऱ्यांनी आपल्याकडे ज्या काही सुविधा आहेत, त्यांचा वापर करून जे काही करता येईल ते केलं. जास्तीत जास्त लोकांची मदत कशी करता येईल यासाठी येथील स्थानिकांनी पुढाकार घेतला. रक्तदान असो अथवा बचावकार्य. यामध्ये सहभागी असलेल्या स्थानिक तरूणांचा मी आभारी आहे.
तरूणाईचा मदतीचा हात
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, ओडिशातील अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने आले आहेत. अशा अपघातांमध्ये जास्त रक्तस्त्राव होऊन जखमींचा मृत्यू होतो. रुग्णालयांना रक्ताची तातडीची गरज आहे. आतापर्यंत २८० हून अधिक लोक मरण पावले आहेत परंतु हा आकडा आणखी पुढे जाऊ नये म्हणूनच लोकांनी आपल्या मित्रांसह रक्त देण्याचे ठरवले.