मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असलेली आधार जोडणीची वाढीव मुदत उद्या १५ मे रोजी संपणार आहे. मात्र त्यानंतरही काही तांत्रिक चुका असल्यास मुलांचे शाळा प्रवेश नाकारू नये. आधारमध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दूर कराव्यात, असे निर्देश राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.
राज्यांमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे नाव आणि आधार सकट त्याची माहिती 'सरल' संकेतस्थळावर जोडली गेली पाहिजे, असा नियम शिक्षण विभागाने घालून दिला होता. याची जोडणी करण्याची मुदत ३० एप्रिलपर्यंत होती; मात्र ती वाढवून १५ मे पर्यंत करण्यात आली आहे. तरीही तांत्रिक चुका असल्यास मुलांचे शाळा प्रवेश नाकारू नये. आधारमध्ये काही तांत्रिक बाबी असतील तर त्या दूर कराव्या, असे निर्देश शासनाने दिले आहेत.
ही मुदत अपुरी असून ती वाढवून दिली पाहिजे. तरच विद्यार्थ्यांची राहिलेली आधार जोडणी पूर्ण होईल; कारण यामध्ये महत्त्वाचा तांत्रिक दोष असून विद्यार्थ्यांच्या 'डेटा'ची नोंदणी होत नाही. त्यामुळे तो दोष निर्माण होतो. एक तर 'मॅन्युअल' पद्धतीने काही ठिकाणी ही प्रक्रिया राबवावी आणि तेवढे विद्यार्थी शासनाने गृहीत धरावे, अशी मागणी महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी केली.