वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक : नितेश राणे
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर चारही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना या निकालाबाबत आपली भूमिका मांडली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने निकाल दिल्यानंतर आता उद्धव ठाकरेंबरोबर उरलेले आमदार आणि खासदार तरी राहतात का, हे उद्या सकाळपर्यंत कळेल असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
आजचा दिवस बघायला मिळणं हा उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांनी दिलेला शाप असल्याचं नितेश राणे म्हणाले. “बाळासाहेब उभ्या आयुष्यभर हिंदुत्वाचा जो विचार घेऊन चालले त्या विचाराच्या विरोधात स्वतःच्या स्वार्थासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली, त्यामुळे नैतिकता उद्धव ठाकरेंच्या तोंडी शोभत नाही. स्वःच्या धर्माशी बेईमानी करणार्या माणसासोबत असंच झालं पाहिजे”, असे नितेश राणे म्हणाले.
“वय आणि शरीर वाढलं तरी काही लोक डोक्याने बालिश असतात, उद्धव ठाकरे त्यांपैकी एक आहेत. आता ना पद, ना पक्ष, ना चिन्ह! त्यामुळे बोंबलून किंवा संविधानाला शिव्या घालून काहीच होणार नाही. जो निकाल आहे तो मान्य करा अथवा स्वतःचा नवीन पक्ष उभारुन त्याला नवीन नाव व चिन्हं देऊन महाराष्ट्रभर फिरा”, असं नितेश राणे म्हणाले.