मुंबई : पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज व यलो अलर्ट इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. भर उन्हाळ्यात पडणा-या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान केले आहे.
ठाण्यात पावसाची हजेरी
ठाण्यात आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. ऐन उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.
महाराष्ट्रात २०२२ पासून आतापर्यंत असा एकही महिना सांगता येणार नाही की पाऊस पडला नाही. पावसाचे हक्काचे ४ महिने वगळता हिवाळा आणि चक्क उन्हाळ्यातही पडणा-या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून रोगराईमुळे डॉक्टरांचे दवाखाने मात्र हाऊसफूल्ल सुरू आहेत.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणाला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला आणि विविध पिकांसह फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांना मूसळधार पावसाचा ऑरेंज व यलो अलर्टचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार मराठवाडा तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या शहरांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांना २९ एप्रिलला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिलला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एक मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही ‘पिवळा अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. कोकण वगळता इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून दोन मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.