कल्याण (वार्ताहर) : गेल्या १० ते १२ वर्षांपासून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध रस्ते रुंदीकरणात बाधित नागरिकांना बीएसयूपी प्रकल्पातील मोफत घरे शासनाच्या व महापालिका संयुक्त विद्यमानाने बुधवारी वाटप करण्यात आली. तर पुढील आठ दिवसात घरांच्या चाव्या देण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले. कल्याणच्या अत्रे रंगमंदिरात हा सोडतीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, शहर अभियंते अर्जुन आहिरे, सचिव संजय जाधव, उपायुक्त धैर्यशील जाधव, उपायुक्त वंदना गुळवे, सहाय्यक उपायुक्त इंद्रायणी कर्चे, कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी आदींसह पालिका पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कल्याण पश्चिम व मांडा टिटवाळा या भागातील नागरिकांना सोडत पद्धतीने मौजे उंबर्डे येथील घरे वाटप करण्यात आली. या इमारतीमध्ये एकूण २५५ सदनिका आहेत. या ठिकाणी एकूण ४ इमारतींमध्ये २०४ सदनिकांचे वाटप करण्यात आले. त्यापैकी तळमजला व पहिला मजलापैकी एकूण ४८ सदनिका दिव्यांग बांधवांना आणि वृद्ध नागरिकांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पाचव्या मजल्यावर रिफ्युज एरिया क्षेत्र ठेवण्यात आले आहेत. तसेच कल्याण पूर्व व डोंबिवली विभागातील बाधितांना इंदिरानगर डोंबिवली पूर्व या भागातील इमारत क्र. १० व ११ या इमारतीमध्ये ८० सदनिकांचे वाटप करण्यात आल्या. तर या इमारतीमध्येदेखील २२ सदनिका दिव्यांग बांधवांना व वृद्ध नागरिकांकरिता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
यावेळी केडीएमसी पालिका आयुक्त, डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, प्रकल्प बाधितांची पात्रता निश्चित करून ठेवण्यात आली होती. मात्र घरे उपलब्ध नव्हती. महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला बीएसयूपी अंतर्गत उर्वरित घरे आहेत ते देण्याचा निर्णय घेतला. या सोडतीत ३७८ पत्र लाभार्थ्यांना घरे वाटप करण्यात येत असून आवश्यक कागदपत्रांची छाननी करून चाव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. घरांचा ताबा देताना ही घरे सुस्थितीत आहे की नाही याची लाभार्थ्यांनी खात्री करून घ्यावी, तसेच एखादे दुरुस्ती असेल तर ती करून दिली जाईल.