कल्याणमध्ये पार पडला ऑफ्रोहचा अन्यायग्रस्त आदिवासींचा महामेळावा
कल्याण : अनुसूचित क्षेत्राबाहेरील ३३ अन्यायग्रस्त जमातींना जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र द्या नाही तर या आदिवासींच्या लोकसंख्येच्या बळावर झालेल्या १२ आमदारांची व २ खासदारांची पदे रद्द करा, अशा मागणीचा पुनरुच्चार विधान परिषदेतील आमदार रमेश पाटील यांनी केला. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन(ऑफ्रोह) महाराष्ट्र जिल्हा शाखा ठाणेच्या वतीने कल्याण येथील नवरंग सभागृहात आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत आयोजित अन्यायग्रस्त आदिवासींच्या महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्य अध्यक्षस्थानी ऑफ्रोहचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून मध्य नागपूचे आमदार विकास कुंभारे, ऑफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मार्गदर्शक दिपक केदारे, राज्य उपाध्यक्ष प्रा. देवराम नंदनवार, मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ, महासचिव रुपेश पाल, राज्य कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, प्रसिद्धी प्रमुख गजेंद्र पौनिकर, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रभान सोनुने, महादेव बेदरे ओमप्रकाश कोटरवार, नरेश खापरे, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर, जिल्हाध्यक्ष दयानंद कोळी, ऑफ्रोह राज्य महिला आघाडीच्या राज्याध्यक्ष अनघा वैद्य, उपाध्यक्ष प्रिया रामटेककर, उपाध्यक्षा भारती धुमाळ, सदस्य कलावती डोमकुंडवार, वंदना सोनकुसरे, पुष्पा किटाडीकर, वनिता नंदनवार, उषा पारशे आदीजण उपस्थित होते.
यावेळी आमदार रमेश पाटील पुढे म्हणाले, आजपर्यंत जे कुणाला जमले नाही ते कार्य ऑफ्रोह ने करून दाखवले. ३३ अन्यायग्रस्त जमातींची महाराष्ट्रभर फिरून अल्पावधीत मोट बांधण्याचे कार्य शिवानंद सहारकर यांनी करून दाखवले. यावेळी आमदार विकास कुंभारे यांनी अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ऑफ्रोहच्या पदाधिकाऱ्यांची भेट घालून दिली.