मुंबई : रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे अपघात की घातपात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्याचे आदेश फडणवीस यांनी पोलिसांना दिले आहेत.
पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरण राज्यात तापले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वारीशे प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे. वारीशे प्रकरणावरून विरोधकांकडून होत असलेल्या आरोप आणि टीकेनंतर राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले असून आता या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे.
दरम्यान, एका आठवड्यात तिथे पाच-सात असे गुन्हे घडले, असं एका वर्तमानपत्रात वाचण्यात आलं. हे काही चांगलं लक्षण नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते. पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, ते कितपत लक्ष देतात यासंबंधिच्या शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्या संबंधिचं वृत्त छापून आलं आहे. आता पत्रकारांची सुद्धा ही अवस्था झाली, तर याचा अर्थ काय, राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता समजून घ्यावं लागेल, असं म्हणत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दररोज काहिना काहीतरी नवीन समोर येतंय. हल्ला आणि हत्या या प्रकारच्या बातम्या येत आहेत. किंवा रस्त्यावरचे अपघात, या दोन गोष्टी महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे, असे शरद पवार म्हणाले.