मुंबई : मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला असून राज्यात तापमानाचा पारा वाढतच आहे. विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता मध्य महाराष्ट्रात अनेक भागांत तापमानात वाढ होत आहे. अशातच पुढचे तीन दिवस तापमानाचा पारा वाढलेलाच राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यांत पुढील तीन दिवस येलो अलर्ट राहणार आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळाची तीव्रता १० आणि ११ मे या दिवशी वाढणार आहे. या कालावधीत राज्यात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण कोकणात १० ते १२ मे दरम्यान, तर पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
रविवारी ब्रह्मपुरीत ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला जिल्ह्यांतही तापमानाचा पारा ४४ अंशांपुढे होता. मराठवाड्यात औरंगाबादमध्ये ४० अंश, तर परभणी आणि नांदेड येथे ४१ अंशांपुढे तापमानाची नोंद झाली.