रत्नागिरी (प्रतिनिधी): डाळही अशी एक गोष्ट आहे जी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाक घरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. खरंतर एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते.
परंतु आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. कंझ्युमर अफेयर विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाक घरातून डाळ नक्कीच गायब होईल.
कंझ्युमर अफेयर विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत ११६.६८ रुपये होती. परंतु आता १८ मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही किंमत वाढून ११८.९८ रुपये इतकी झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस या किंमती १२० रुपयाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण जर असे झाले तर मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल.