दिल्ली : पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटीसंदर्भात उद्या, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा काल सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. वरिष्ठ वकील मनिंदर सिंह यांनी या प्रकरणी सरन्यायाधीशांसमोर युक्तिवाद केला. न्यायालयाने याचिकेची प्रत पंजाब सरकारला देण्यास सांगितले आता त्यावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
पंजाब सरकारच्या एका निवेदनात असे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या बुधवारी फिरोजपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटींच्या सर्वसमावेशक चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. एका अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती मेहताब सिंग गिल आणि प्रधान सचिव गृह आणि न्यायमूर्ती अनुराग वर्मा यांचा समावेश असेल. ही समिती तीन दिवसांत आपला अहवाल सादर करेल.