Friday, August 21, 2026

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा
गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची पाणी पातळी हळू हळू ओसरत आहे पण अनेकांना अद्याप घरी जाणे शक्य झालेले नाही. जे पुन्हा घरी पोहोचले आहेत ते हळू हळू आपली घरे स्वच्छ करून संसार पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतीचे पुरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पाणी पूर्ण ओसरल्यानंर शेतजमिनीच्या स्थितीचा नेमका अंदाज येईल.
पूरग्रस्तांचे जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. प्रभावित नागरिक आपली घरे आणि शेती पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्व सरमा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील पुरामुळे झालेल्या जीवित व वित्तहानीची तसेच सुरू असलेल्या मदत आणि पुनर्वसन अभियानाची सविस्तर माहिती दिली.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या २० ऑगस्टच्या आकडेवारीनुसार आता सर्व नद्या धोक्याच्या पातळीखाली वाहत आहेत. आतापर्यंत १०६ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान शिवसागर, चराईदेव, जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांमध्ये झाले आहे. राज्यात ३,०८३ हेक्टर कृषी जमीन पाण्याखाली आहे. सध्या मदत छावण्यांमध्ये २३८ जणांनी आश्रय घेतला आहे. मदत वितरण केंद्रांवर १,१६५ छावणीबाहेरील रहिवाशांना मदत मिळत आहे. प्रभावित भागांमध्ये गुरुवारी राज्य सरकारने ४ वैद्यकीय पथके तैनात केली. सरकारी अधिकारी नुकसानीचे आकलन करण्यात व्यस्त आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >