Thursday, July 23, 2026

Nashik : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्याचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून ३ भाविक जखमी

Nashik : त्र्यंबकेश्वरला वादळी वाऱ्याचा तडाखा, वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून ३ भाविक जखमी

Nashik : नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात बुधवारपासून जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या, नाले दुथडी भरुन वाहत असून काही ठिकाणी रस्त्यावरुन पाणी वाहू लागल्याने रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण (Gangapur Dam) ८० टक्क्यांपर्यंत भरल्याने या हंगामात गंगापूर धरणातून प्रथमच विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गुरुवारी सकाळी रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आले.नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना पावसाचा तडाखा पडला आहे.

वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडून ३ भाविक जखमी

दरम्यान, बुधवारी रात्री त्र्यंबकेश्वर शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एका घराचे पत्रे उडून थेट रस्त्याने जाणाऱ्या भाविकांवर पडले. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. बुधवारी रात्री त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. जोरदार वाऱ्यामुळे सारडा यांच्या घराचे पत्रे उडाले. त्याच वेळी नेमके मेनरोडने आठ भाविकांचा समूह जात होता. उडालेले पत्रे हे थेट मेनरोडने जाणाऱ्या भाविकांच्या अंगावर पडले. या घटनेत तीन भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी यवतमाळ जिल्ह्यातील २० वर्षीय अमित सुभाष आढे या तरुणाची प्रकृती गंभीर आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी तत्परता दाखवत अमित आढे यांना दुचाकीवरून त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉ. वर्षा वरपे, डॉ. श्वेता रणदिवे आणि सहायक धीरज गायकवाड यांनी त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार केले. प्राथमिक उपचार आणि प्रकृती स्थिर झाल्यानंतर, पुढील विशेष उपचारासाठी आढे यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

गंगापूर धरणातून 7,413 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

दरम्यान, नाशिक शहर परिसरात मंगळवारी रात्रीपासून संततधार सुरु असून बुधवारी रात्री पावसाचा जोर अधिक वाढला. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात, पावसाची संततधार कायम असल्यामुळे गुरुवारी सकाळी ८ वाजता गंगापूर धरणातून सोडण्यात येणारा पाणी विसर्ग एकूण ३१६५ क्युसेक इतका करण्यात आला आहे. हा विसर्ग ज सकाळी ९.३० वाजता ४२३६ क्युसेक करण्यात आला. तसेच नंतर पुन्हा त्यात वाढ करण्यात आली असून सकाळी १०.३० वाजता एकूण विसर्ग ५२९५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला. तर सकाळी 11 वाजल्यापासून विसर्ग 6,354 क्यूसेक्सवरून 7,413 क्यूसेक्स करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग टप्प्याटप्प्याने पुन्हा वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षाने याबाबत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >