Thursday, July 23, 2026

Ashadhi Wari : ‘कापडी पिशवीची वारी’तून पर्यावरण आणि समतेचा संदेश; विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वारकऱ्यांची दाद

Ashadhi Wari : ‘कापडी पिशवीची वारी’तून पर्यावरण आणि समतेचा संदेश; विशेष विद्यार्थ्यांच्या कलाकृतींना वारकऱ्यांची दाद

मुंबई : यंदाच्या आषाढी वारीत भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समावेशकतेचा संदेश देणारा एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘कापडी पिशवीची वारी’ या संकल्पनेद्वारे प्लास्टिकमुक्त वारीचा संदेश देतानाच विशेष विद्यार्थ्यांच्या कलेलाही व्यासपीठ मिळाले आहे.

या उपक्रमात नरेपार्क विशेष मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आणि मेहनतीने विठ्ठलाच्या विविध प्रतिमांनी सजवलेल्या कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. या पिशव्यांचे डिझाइन तयार करण्यासाठी प्रभादेवी येथील रचना संसद अप्लाइड आर्ट महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. त्यांच्या संकल्पनांवर आधारित आकर्षक चित्रे विशेष विद्यार्थ्यांनी कापडी पिशव्यांवर साकारली आहेत.

या उपक्रमाचा उद्देश केवळ कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे नाही, तर पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे आणि विशेष मुलांच्या कलागुणांना समाजासमोर आणणे हाही आहे. प्रत्येक पिशवीतून पर्यावरणाची काळजी, स्वच्छतेचे महत्त्व आणि सर्वांना समान संधी मिळावी हा संदेश दिला जात आहे.

श्रीरंग ट्रस्टचे डॉ. सुमित पाटील यांनी यावेळी सांगितले की, विठ्ठल हा केवळ श्रद्धेचा विषय नसून निसर्गाशी जोडणारी भावना आहे. झाडे, नद्या, पक्षी, प्राणी आणि संपूर्ण सृष्टीत विठ्ठलाचे अस्तित्व असल्याची भावना जपली पाहिजे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करून कापडी पिशव्यांचा स्वीकार करणे हीच निसर्गसेवा आणि विठ्ठलसेवा असल्याचे त्यांनी सांगितले.

वारीदरम्यान या पिशव्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयींचा प्रसार केला जाणार आहे. विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृती त्यांच्या आत्मविश्वासाचे आणि समाजातील सक्रिय सहभागाचे प्रतीक ठरत आहेत.

यावेळी आर्थर रोड परिसरातील पारशीवाडी मित्र मंडळानेही विशेष विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच रचना संसद महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉ. अदिती झा याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >